पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पावन नगरीत प्रथमच सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा स्वेरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सोयी-सुविधा, विविध विभागांचा समन्वय, स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा तसेच विकासकामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य होते. यावेळी उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, समाजकल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धशाळा समितीचे सभापती रामपा चिवडाशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, सूर्यकांत भुजबळ, अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व स्थायी समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
या सभेमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी आषाढी वारीचे महत्त्व अधोरेखित करत, “वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेची ओळख आहे. लाखो वारकरी पंढरपूरमध्ये येतात. त्यांच्या सोयी-सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहता कामा नये. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून वारीचे नियोजन आदर्श पद्धतीने करावे,” असे मत व्यक्त केले.*
यावेळी समाज कल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते यांनी वारी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी ‘प्री वारी’ आणि ‘पोस्ट वारी’ ही संकल्पना सभागृहासमोर मांडली.” वारीपूर्व काळात स्वच्छता, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती आणि मूलभूत सुविधांचे नियोजन तसेच वारीनंतर तात्काळ स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक ठिकाणांचे पुनर्संचयितीकरण यासाठी स्वतंत्र कृती आराखडा असावा, असे त्यांनी नमूद केले.
बैठकीत आषाढी वारीच्या तयारीसह ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, समाज कल्याण, महिला व बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. संबंधित विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाच्या कामकाजाची माहिती सादर करत आगामी काळातील नियोजन मांडले.
आषाढी वारी अधिक स्वच्छ, सुरक्षित, सुव्यवस्थित आणि आदर्श पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

More Stories
बापरे… सोलापूर विमानतळावरून नाईट लँडिंगसाठी किती अडथळे आहेत हे तुम्हाला माहित आहे का?
सोलापुरात हायवेवर ट्रकचे एसी चोरणाऱ्या टोळीला अटक
सचिन कवले यांच्या चौकशीसाठी समितीला मिळेनात कागदपत्रे