June 22, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

चेतनसिंह केदार म्हणाले राजेंद्र राऊत यांच्या विजयाचे मिळाले समाधान

सोलापूर : भाजपचा पदाधिकारी असल्यामुळे बार्शीची तुझ्याकडे जबाबदारी असताना विधान परिषदेवर राजेंद्र राऊत विजयी झाल्याचे मोठे समाधान मिळाल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार यांनी व्यक्त केली.

सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. पालकमंत्री जयकुमार गोरे व विजयी उमेदवार राजेंद्र राऊत यांच्याबरोबर विजयाचा गुलाल उधळून सभापती चेतनसिंह केदार हे जिल्हा परिषदेत आपल्या कामकाजासाठी आले होते. विजयाबाबत प्रतिक्रिया विचारल्यानंतर ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी टीमवर्कने पार पाडली. यात महायुतीचे सर्व आमदार, खासदार, जिल्हा परिषदे, नगरपालिकेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती यांचे श्रेय आहे. भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी असताना बार्शीचे कामकाज माझ्याकडे आले होते. त्यामुळे या निवडणुकीची मोठी जबाबदारी पार पाडत असताना अनेक अनुभव आले. आपल्या कारकिर्दीत ही निवडणूक यशस्वी झाल्याचे समाधान आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनीही जिल्हा परिषदेच्या सदस्यांची एकजूट ठेवण्यात मोलाची कामगिरी बजावली असल्याचेही नमूद केले.

आषाढीची आता तयारी सुरू…

विधान परिषदेच्या निवडणुकीची धावपळ संपली आहे. आता जिल्हा परिषदेच्या कामकाजात आम्ही सर्व पदाधिकारी लक्ष घालणार आहोत. आषाढी यात्रा तोंडावर आहे. यात जिल्हा परिषदेचा मोठा रोल आहे. आरोग्य, बांधकाम आणि ग्रामपंचायत विभागाची मोठी जबाबदारी आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. अध्यक्ष वैद्य यांच्याशी चर्चा करून पदाधिकारी व अधिकारी यांची समन्वय बैठक घेतली जाणार आहे. त्यानंतर 27 जून रोजी पालखी मार्गाचा दौरा करून नियोजनाला गती देण्यात येणार असल्याचे सभापती केदार यांनी सांगितले.