August 25, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ राज्य अतिरिक्त सरचिटणीसपदी अरुण क्षीरसागर तर उपाध्यक्षपदी गिरीश जाधव

सोलापूर : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याची केंद्रीय कार्यकारिणीची बैठक नागपूर येथे राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत विविध विषयावर चर्चा होऊन नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

यावेळी केंद्रीय कार्यकारिणीमध्ये अतिरिक्त सरचिटणीसपदी अरुण क्षीरसागर तर उपाध्यक्षपदी गिरीश जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या कार्याचा अनुभव, संघटनात्मक योगदान आणि कर्मचारी हितासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

अरुण क्षीरसागर हे गेल्या सुमारे २० वर्षांपासून कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रभावीपणे कार्यरत आहेत. कर्मचारी प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे, कर्मचाऱ्यांना सेवा विषयक मार्गदर्शन करणे आणि विविध प्रशासकीय प्रश्नांवर संघटनेच्या माध्यमातून आवाज उठविणे, यामध्ये त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे.त्यांच्या उत्कृष्ट सेवाकार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार तसेच विविध सामाजिक व संघटनात्मक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच सोलापूर जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य म्हणूनही त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या प्रदीर्घ संघटनात्मक अनुभवाचा उपयोग राज्यातील कर्मचारी संघटन अधिक सक्षम करण्यासाठी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करून अनेक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अरुणभाऊ क्षीरसागर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे व गिरीश जाधव यांची केंद्रीय कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.त्यामुळे त्यांच्या निवडीचे कर्मचारी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे.

या बैठकीस कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष गणेश मडावी, महासचिव सुरेश तांबे, सरचिटणीस प्रभाकर सोनडवले, वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगळ, सल्लागार राज इंगळे यांच्यासह केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी व विविध जिल्ह्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.अरुण क्षीरसागर व गिरीश जाधव यांच्या निवडीबद्दल कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्यातील सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, शाखाध्यक्ष तसेच कर्मचारी बांधव-भगिनींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.