March 3, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

महाअवास अभियानात सोलापूर झेडपीचे मोठे यश

सोलापूर: केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांच्या अंमलबजावणीमध्ये गतिमानता व गुणवत्ता आणण्यासाठी  राज्यात महाआवास अभियान राबविण्यात येत असून सन 2021-22  मध्ये महाआवास अभियान ग्रामीणमध्ये सोलापूर जिल्ह्यास राज्यात 4 पुरस्कार मिळाले असून महाआवास अभियानमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचा बोलबाला झाला आहे.

2021-22 मध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे पुरस्कार वितरण व सन 2023-24 महाआवास अभियानाचा शुभारंभ शुक्रवारी मुंबईमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, संचालक राजाराम दिघे उपस्थित होते. सोलापूर जिल्हयास पुणे विभागामध्ये संख्यात्मक दृष्टीने सर्वात जास्त उद्दिष्ट आहे व भूमीहीन लाभार्थ्यांची संख्यासुध्दा जास्त आहे. तरीदेखील सोलापूर जिल्हयाने अथक प्रयत्न करून सदर महाआवास अभियानअंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये जिल्हयास पुढीलप्रमाणे एकूण 4 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. महाआवास अभियान कालावधीत ज्या लाभार्थ्यांची घरकुल पुर्ण झालेली आहेत, त्यापैकी किमान 10% लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी वाळूला पर्याय क्रश सँड,सिमेंट ब्लॉक,फ्लॉय ॲश ब्रिक्स,इंटरलॉकिंग,हॉलो ब्रिक्स,इत्यादींचा वापर करून तयार केलेली घरकुले या उपक्रमामध्ये सोलापूर जिल्हयास राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. महाआवास अभियान कालावधीत ज्या लाभार्थ्यांची घरकुल पुर्ण झालेली आहेत. त्यापैकी किमान 10% लाभार्थ्यांना घरकुल बांधकामध्ये फरशी/लादी,रंगरंगोटी,किचन गार्डन/परसबाग,रेन वॉटर हार्वेस्टींग,सौरऊर्जा साधने व नेट बिलिंग इ.वापर करून तयार केलेली घरकुले या उपक्रमामध्ये सोलापूर जिल्हयास राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

महाआवास अभियान अंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा  उपलब्ध करून देणे, मंजुरी देऊन घरकुले पुर्ण करणे,कमी कालावधीत लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण करणे,ग्रामीण गवंडी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे,पहिला हप्ता बरोबरच लाभार्थ्यांना मनरेगा मस्टरचा लाभ देणे पुर्ण लाभार्थ्यांना सर्व शासकिय योजनांचा लाभ देणे,नाविण्यपुर्ण घरकुले बांधणे,लाभार्थ्यांना मुलभुत नागरी सेवा देऊन कृतीसंगम करणे यामध्ये सोलापूर जिल्हयातील ग्रामपंचायत निंबर्गी (ता.दक्षिण सोलापूर) यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाआवास अभियान अंतर्गत सर्वोकृष्ट ग्रामपंचायत यामध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.  महाआवास अभियान अंतर्गत लाभार्थ्यांना जागा उपलब्ध नव्हती त्या लाभार्थ्यांना PDU मधून जागा उपलब्ध करून देऊन त्यासोबत सदर लाभार्थ्यांना गवंडी प्रशिक्षणाचा लाभ देऊन लाभार्थ्यांचे एक गृहसंकुल तयार करण्यात आले सदर बांधण्यात आलेल्या गृहसंकुलाला राज्यस्तरावरील सर्वोकृष्ट गृहसंकुल या नामांकनाचा प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत भांबुर्डी (ता.माळशिरस) यांना प्राप्त झालेला आहे.सदर पुरस्कार सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ.सुधीर ठोंबरे यांनी स्वीकारला तसेच इतर पुरस्कार संबंधित ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर मनीषा आव्हाळे यांनी भावास अभियानाला जोर दिला. यापूर्वी महाआवास अभियानात सोलापूर जिल्हा परिषद कितीतरी मागे होती. आव्हाळे यांच्या पाठपुराव्याने जिल्हा परिषदेला चार पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्याकडे जिल्हा विकास यंत्रणेचा पदभार असताना त्यांनीही जागा नसणाऱ्यांना महसूल विभागाकडून जागा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला होता हे येथे उल्लेखनीय.

 सोलापूर जिल्हयास महाआवास अभियानामध्ये 4 पुरस्कार प्राप्त झाले असून पुढील वर्षी यापेक्षा अधिक पुरस्कार कशाप्रकारे प्राप्त होतील या प्रमाणे नियोजन करून काम करावे व पुरस्कार प्राप्त सर्वांचे तसेच घरकुल विभागात काम करणाऱ्या सर्व टिमचे अभिनंदन.

मनीषा आव्हाळे

मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद सोलापूर.

सोलापूर जिल्ह्यात यावर्षी पण घरकुलचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून सन 2023-24 मध्येसुद्धा सोलापूर राज्यात अग्रेसर राहील.

डॉ. सुधीर ठोंबरे

प्रकल्प संचालक

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा