
सोलापूर : लोकसभा निवडणूक प्रचाराच्या पुढील काळात, भाजप माझ्यावर कौटुंबिक आणि वैयक्तिक चुकीचे खोटे नाटे आरोप करण्याची शक्यता असल्याची भीती सोलापूर लोकसभा काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली.
सोलापूर शहरातील अवंतीनगर येथे आयोजित शिक्षक सन्मान कृती समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. याप्रसंगी माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, उद्योजक श्रीकांत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. भाजपकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, केलेल्या कामाचा गवगवा करणे हे शिंदे कुटुंबियांच्या रक्तात नाही. आम्ही आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पूर्णवेळ सोलापूरकरांच्या सेवेत कायम असतो. सातपुतेंकडून मागील १० वर्षात सोलापूरमध्ये कोणकोणती विकास कामे झाली यावर चर्चा होताना दिसून येत नाही. त्यावरून शिंदे यांनी ‘मी माझ्या १५ वर्षांच्या आमदारकीच्या कालखंडात काय काय विकास कामे केली आहेत, ती जाहीरपणे सर्वासमोर सांगते. भाजप किंवा त्यांचे उमेदवार राम सातपुते यांच्यासारखे मुख्य मुद्द्यावरून पळ काढत नसल्याची’ बोचरी टीकाही यावेळी केली.
या निमिताने मी सर्व सोलापूरकरांना हेही सांगू इच्छिते की भाजपचे शिंदे कुटुंबियावर निवडणुकी पुरते खोटे नाटे आरोप करायचं सत्र इथेच थांबणार नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. पुढचे ३०-३५ दिवस आता माझ्यावर आणि माझ्या परिवारावर असे अनेक खोटे नाटे आरोप भाजपतर्फे करण्यात येतील. खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याचेही प्रयत्न केले जातील अशी मला शंका आहे. त्यासाठी भाजपची संपूर्ण टीम कामाला लागली आहे. मात्र भाजपच्या या षडयंत्राला सर्वसामान्य सोलापूरकर जनता आता बळी पडणार नाही, याची मला खात्री असल्याचा विश्वासही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
सध्या भाजपकडून’सोलापुरात आता रामराज्य येणार! असल्याचा प्रचार केला जात आहे. म्हणजे गेली दहा वर्षे सोलापुरात रावणाचं राज्य होतं असं भाजपवाल्यांना वाटत आहे का? भाजपवल्यांकडूनच तसा प्रचार केला जात असल्याचा टोलाही प्रणिती शिंदे यांनी भाजप लगावला आहे. तसेच गेली १० वर्ष भाजपकडे देशाची, राज्याची , सोलापूरची सत्ता होती. मात्र, भाजपने सोलापूरच्या विकासासाठी काय कामे केली? हे त्यांना अजूनही सांगता येत नाही. त्यामुळे राम सातपुते यांनी आधी सोलापूरकरांच्या प्रश्नांना आधी उत्तरे द्यावीत, असे आवाहनही शिंदे यांनी यावेळी केले.