February 20, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारात सक्षम राष्ट्र निर्मितीची क्षमता: कुलदीप जंगम 

सोलापूर  : छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंड शौर्य दाखवून स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्य निर्मितीत सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेतले. या स्वराज्यात सर्व जाती धर्मातील गोरगरीब लोकांच्या विकासाला महत्त्व होते. आजच्या आधुनिक जगातही महाराजांचे विचार तेवढेच प्रभावी असून त्यांच्या विचारात सक्षम राष्ट्र निर्मितीची क्षमता असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396 व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर व जिल्हा क्रीडा युवक संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी पदयात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सूर्यकांत भुजबळ साहेब, जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखाधिकारी श्रीमती मिनाक्षी वाकडे, तहसीलदार नदाफ शेख आदि अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आपण सर्वांनी अंगीकार केला पाहिजे. विद्यार्थ्यांना शालेय किंबहुना लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा तसेच विचारांचे बाळकडू देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. महाराजांचे विचार सर्व जाती धर्मातील लोकांच्या सर्वांगीण विकासाची प्रेरणा देतात तसेच राष्ट्राला पुढे नेण्याची क्षमता ठेवतात, असे त्यांनी सांगितले. यावेळी साईनाथ रुद्रके यांनी शिवचरित्रावर दिलेल्या व्याख्यानातून शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास समोर उभा केला.

प्रारंभी सकाळी सात वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी पार्क चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व चार हुतात्मा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेचा शुभारंभ केला.

या पदयात्रेमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता, पदयात्रा पार्क चौक ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान रंगभवन चौक दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रेमध्ये पोलीस बँड पथक, हरीभाई देवकरण प्रशाला एनसीसी, मॉडर्न हायस्कूल, सेवासदन हायस्कूल, दमानी विद्यामंदिर, श्री स्वामीनारायण गुरुकुल, एस व्ही सी एस हायस्कूल, सिद्धेश्वर वुमन्स इंजिनिअरिंग कॉलेज, सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज इत्यादी शाळा व महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. पद यात्रेच्या सुरुवातीला पारंपारिक युद्ध कला कौशल्य, कवायत विद्यार्थ्यांनी सादर केली. तसेच ढोल ताशांच्या गजरात पदयात्रा मार्गस्थ करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान याठिकाणी पदयात्रा पोहोचल्यानंतर येतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह सर्व उपस्थित अधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण केला. तर यावेळी छत्रपती शिवाजी प्रशालेतील विद्यार्थिनींनी शिवजन्मोत्सव गीताच्या गायनातून लक्ष वेधून घेतले. त्यानंतर राष्ट्रगीत व राज्य गीताचे गायन होऊन कार्यक्रम संपन्न झाला.