February 28, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

काय म्हणता… सोलापुरात ग्रामीण पोलीस भरवणार आठवडी बाजार

सोलापूर : गावोगावचे आठवडी बाजार भाजीपाल्याच्या खरेदीसाठी प्रसिद्ध आहेत. इतकेच काय सोलापुरातील बुधवार बाजारही सर्वांच्या परिचयाचा आहे. पण आता सोलापूर ग्रामीण पोलीस सोलापुरात आठवडी बाजार भरवणार आहेत.

होय. हे खरे आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सोलापुरातील पोटफाडी चौकाजवळ आठवडी बाजार भरविण्याचे ठरवले आहे. ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या पोलीस मुख्यालयाच्या पेट्रोल पंपावर हातोडी बाजार भरणार आहे. हा पेट्रोल पंप सुरू केल्यानंतर हा प्रयोग झाला होता. पण आता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सेंद्रिय शेती बाबत एक मोठे पाऊल उचलले आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे स्वतः वृक्षप्रेमी आहेत. पोलीस इन करीत सोलापूर जिल्ह्याचा दौरा करीत असताना त्यांनी शेतीतील अनेक प्रयोग पाहिले आहेत. सेंद्रिय शेती हा त्यांचा आवडता विषय आहे. विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी पोलीस ठाण्याच्या भेटीत वेळ काढून शेतीला भेट दिली आहे. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा मोठा प्रयोग केला आहे या शेतकऱ्यांना बाजारपेठेचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे व तसेच ग्राहकांना विषमुक्त भाजीपाला मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यांनी सोलापूर ग्रामीण पेट्रोल पंपावर हा आठवडी बाजार सुरू करण्याचे नियोजन केले आहे. एक मार्च रोजी या आठवडी बाजाराचे उद्घाटन होणार आहे. सकाळी 9 ते 12 या वेळेत सोलापूर शहरवासीयांना विषमक्त भाजीपाला या पेट्रोल पंपावरून खरेदी करता येणार आहे.

अलीकडच्या काळात कीटकनाशक व रासायनिक खतांच्या वापरामुळे अशी फळे व भाजीपाला खाणाऱ्या नागरिकांना कॅन्सर व इतर रोगांचा धोका निर्माण झाल्याचे दिसून आले त्यामुळे कीटकनाशक व रासायनिक खताच्या वापराविना पारंपारिक शेणखत व कंपोस्ट खत वापरून नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व कीटकनाशक व रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी अलीकडे शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. सेंद्रिय शेतीचे प्रयोग अनेक सांगितले जातात. पण हे प्रयोग खरे आहेत का? हे तपासणे गरजेचे असते. सेंद्रियच्या नावावर अनेकजण रासायनिक खत वापरलेले फळे व भाजीपाला विक्रीस आणतात. यात विश्वासार्ह जपण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी एक पाऊल टाकले आहे. सेंद्रिय आठवडी बाजार असे या प्रयोगाला नाव देण्यात आले आहे. त्यामुळे या पेट्रोल पंपावर खात्रीशीर सेंद्रिय भाजीपाला मिळणार आहे.