सोलापूर : रोजगार हमी योजना व फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांनी माढा तालुक्यातील सुरळी व अकोले खुर्द येथे केळी, डाळिंब व पेरू उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणीच्याप्रसंगी शासन शेतकऱ्यांसोबत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी फलोउत्पादन मंत्री गोगावले यांनी शेतकरी संतोष पाटील (डाळिंब), संजय पाटील (आंबा), ऋषिकेश पाटील (डाळिंब), मनोज काळे (पेरू) व भागवत काळे (केळी) यांच्याशी चर्चा करून रोपे खरेदी, खत-औषध फवारणी, उत्पादनानंतर व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक, बाजारभावातील चढ-उतार व हवामानातील बदल अशा अडचणी जाणून घेतल्या. तसेच फळबाग लागवडीसाठी मिळणाऱ्या शासकीय योजना व अनुदानाबाबतही चर्चा करण्यात आली.
माढा तालुक्यातील एकूण फळबाग लागवडीखालील क्षेत्र १०,७९९.२७ हेक्टर असून त्यात डाळिंब २,२०५.४५ हेक्टर, द्राक्ष १,९९७.७० हेक्टर व केळी ३,७८९.६० हेक्टर इतके क्षेत्र आहे. उसानंतर सर्वाधिक क्षेत्र केळीचे असून, युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. या पाहणी दौऱ्यास आमदार अभिजीत पाटील, संजय कोकाटे, कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी हनुमंत बोराटे, तंत्र अधिकारी अभिजीत देडे तसेच इतर अधिकारी, पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

More Stories
सोलापुरात रमजान ईद उत्साहाने साजरी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सोलापुरात आध्यात्मिक मानवंदना
सोलापुरात पुढील वर्षापासून बोर्डाचे पेपर ठेवणार पोलीस कोठडीत