सोलापूर : नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या मार्गदर्शनाखाली बेघरांसाठी शोध मोहीम राबवण्यात आली. यामध्ये 20 बेघर व्यक्तींना आपुलकी निवारा केंद्रात आश्रय मिळाला आहे.
सोलापूर महानगरपालिका, आपुलकी बेघर निवारा केंद्र, जय भारत माते सेवाभावी संस्था आणि सोलापूर शहर पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध भागांमध्ये बेघर व्यक्तींची विशेष शोध मोहीम राबवण्यात आली. महापालिका आयुक्त आणि उपायुक्त यांच्या आदेशानुसार तसंच नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. यावेळी सिद्धेश्वर मंदिर परिसर, दर्गाह परिसर, मशीद परिसर, जिल्हा परिषद, पासपोर्ट कार्यालय, होम मैदान आणि स्मार्ट सिटी परिसरात पाहणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण 20 बेघर व्यक्ती आढळून आल्या. त्यांची आवश्यक नोंद घेऊन, त्यांना आपुलकी बेघर निवारा केंद्र, जिल्हा क्रीडा संकुलामागे, कुमठा नाका, सोलापूर इथं सुरक्षित निवारा, राहण्याची व्यवस्था आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आपुलकी बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक अशोक वाघमारे, सोलापूर महानगरपालिकेचे समूह संघटक वसीम शेख, सत्यजित वडावराव, साईप्रसाद पोळ, अरविंद महाले तसंच काळजीवाहक राघवेंद्र बोरगावकर, सुनीता म्हस्के, धर्मा कांबळे, दिलशाद शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले. शहरातील बेघर, निराधार आणि गरजू नागरिकांना सुरक्षित निवारा मिळावा, या उद्देशान अशी शोध मोहीम पुढील काळातही नियमितपणे राबवण्यात येणार असल्याच यावेळी सांगण्यात आले.
शहरातील डफरीन चौक सिग्नलजवळ, रेल्वे स्टेशन, सिव्हिल हॉस्पिटल परिसर आणि इतर भागात आजही बेघर व्यक्ती आढळून येतात. त्यांनाही आसरा मिळण्यासाठी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. जोपर्यंत सोलापुरातील सर्व बेघर व्यक्तींना आपुलकी निवारा केंद्रात आश्रय मिळत नाही, तोपर्यंत आपणही बेघर महिलांसोबत रस्त्यावर निवास करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

More Stories
उजनी धरणातून चंद्रभागा नदीपात्रात वारीच्या तीन दिवस अगोदर पाणी येणार
खाजगी शाळेनेच घेतला सोलापूरच्या झेडपी शाळेचा ताबा
आषाढी वारीत अत्यावश्यक रुग्णांकरिता प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा