March 3, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

द. सोलापूर : सुभाष देशमुख भाजपचा गड राखणार ?

सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक महाविकास आघाडीतील बंडखोरी व अपक्षांमुळे चुरचशीची ठरली आहे. अशाही परिस्थितीत भाजपच्या फिक्स मतांचे गणित आखून भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख हा गड कायम राखण्यात यशस्वी होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात याही वेळेस जवळपास 28 जण निवडणूक रिंगणात आहेत. यात महायुतीतर्फे भाजपचे सुभाष देशमुख तर महाविकास आघाडीतर्फे उबाठाचे अमर पाटील निवडणूक रिंगणात आहेत. खरे पाहिले तर पूर्वी हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता.माजी मंत्री स्व. आनंदराव देवकते,  माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार दिलीप माने यांनी या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले आहे. भाजप- सेना- युती असताना पहिल्यांदा सेनेचे  रतिकांत पाटील यांनी हा गड फोडला. त्यानंतर  भाजपचे आमदार सुभाष देशमुख दोनदा निवडून आले आहेत. आता तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्याच्या तयारीत ते आहेत. अशातच आता उबाठाकडून रतिकांत पाटील यांचे चिरंजीव अमर पाटील यांना त्यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. असे असले तरी महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. या मतदारसंघात काँग्रेसतर्फे माजी आमदार दिलीप माने, गत वेळेस निवडणूक लढविलेले बाबा मिस्त्री, सुरेश हसापुरे, कोगनुरे, धर्मराज काडादी इच्छुक होते. पण महाविकास आघाडी जागा वाटपावेळेस वाटाघाटीच्या आधीच उबाठातर्फे अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसमध्ये गोंधळ वाढला. कोगनूरे, मिस्त्री यांनी दुसऱ्या पक्षाची वाट धरली, दिलीप माने यांनी निवडणुकीतून माघार घेतली तर धर्मराज काडादी यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत सहभाग घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये फाटाफूट झाली आहे. काँग्रेसचे बरेचसे नेते काडादी यांच्या प्रचारात गुंतल्याचे दिसून येत आहेत. त्याचबरोबर प्रहार जनशक्तीतर्फे बाबा मिस्त्री,  वंचिततर्फे संतोष पवार, अपक्ष म्हणून सोमनाथ वैद्य, राठोड, आप्पाराव कोरे असे तुल्यबळ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे दक्षिणची निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. निवडणूक प्रचारात पदयात्रा, होम टू होम, कॉर्नर बैठका, तर प्रचारकांच्या सभा यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. पाणी वीज रस्ते व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यामुळे मतदारांची मोठी कर्मणूक झाली आहे.

फाटाफुटीमुळे कोण कोणाच्या बाजूने हे स्पष्ट होत नाही. भाजपची मते फिक्स असून काडादी यांच्यामुळे पाटील यांना फटका बसू शकतो अशी चर्चा आहे. इतर उमेदवारांनीही मोठी यंत्रणा लावल्याने मतांची फाटाफूट झाल्याने भाजपचा गड कायम राहणार अशी चर्चा आहे. अमर पाटील यांच्याबरोबरच काडादी, बाबा मिस्त्री यांनी वातावरण ढवळून काढल्यामुळे देशमुख यांचा अश्व रोखणार की बदल घडणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी अपक्ष म्हणून तुल्यबळ उमेदवारांनी निवडणूक लढवली पण  अपक्ष उमेदवारांना या मतदारसंघात आत्तापर्यंत तरी यश आलेले नाही हे विशेष.

काय आहे मतदार संघाचा इतिहास…

सन 1990

आनंदराव देवकते : काँग्रेस – 39870

सिद्रामप्पा पाटील : अपक्ष – 34782

सुभाष जगताप : सेना – 6002

सन 1995

आनंदराव देवकते : काँग्रेस – 41530

भीमराव बिराजदार : अपक्ष – 34494

शिवाजीराव पिसे : सेना – 17958

सन 1999

आनंदराव देवकते : काँग्रेस – 39951

गोपाळराव कोरे : राष्ट्रवादी काँग्रेस – 33123

रातीकांत पाटील : सेना – 22677

माहिती उपलब्ध नाही…

सन 2004

सुशीलकुमार शिंदे : काँग्रेस – 62196

उदय पाटील : अपक्ष – 32344

शिवाजीराव पिसे : सेना – 20598

सन 2009

दिलीप माने : काँग्रेस – 72068

रतिकांत पाटील : सेना – 54406

सन 2014

सुभाष देशमुख : भाजप – 70070

दिलीप माने : काँग्रेस – 42954

गणेश वानकर : सेना – 14188

बाळासाहेब शेळके : राष्ट्रवादी काँग्रेस – 12363

सन 2019

सुभाष देशमुख : भाजप – 87223

बाबा मिस्त्री : काँग्रेस – 57976

युवराज राठोड : वंचित – 8579