माध्यमिक शिक्षण विभागाच्या कारभारात होत आहे सुधारणा
सीईओ कुलदीप जंगम यांनी केले जगताप यांच्या कामाचे कौतुक

सोलापूर : माध्यमिक शिक्षण विभागाच्या कारभारात सुधारणा होत असल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी समाधान व्यक्त केले आहे. या विभागाप्रमाणेच समाजकल्याण व पशुसंवर्धन या विभागाचेही कामकाज सुधारले जाईल, असे ते म्हणाले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध विभागांमध्ये होत असलेल्या बदलाबाबत समाधान व्यक्त केले. प्राथमिक शिक्षण, प्रशासन आणि आरोग्य विभागात झालेल्या बदलाबाबत त्यांनी माहिती दिली. माध्यमिक शिक्षण विभागाबाबत तक्रारी भरपूर होत्या. वास्तविक हा विभाग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली असला तरी कारभार पुणे उपसंचालक यांच्या अधिपत्याखाली येतो. या विभागाला जिल्हा परिषदेचे मनुष्यबळ आहे. माध्यमिकच्या कोणत्याच फाईली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे येत नाहीत. त्यामुळे या विभागाचा नेमका गोंधळ काय हे समजून येत नाही. त्यासाठी माध्यमिक विभागाचे बैठक घेऊन आढावा घेतला. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे कोणकोणते कामकाज येते याची माहिती घेतली आहे. फायली प्रलंबित राहू नयेत यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी जगताप यांना दिल्या आहेत. त्यानुसार त्यांनी कामकाजाला सुरुवात केली आहे. शिक्षणाधिकार्याने वाढीव कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे. कार्यालयातील सद्यस्थितीतील कामसुकार कर्मचाऱ्यांचेही मूल्यमापन करून त्यांना हटवले जाईल व नवीन कर्मचारी दिले जातील. शिक्षण आयुक्तांनी हे माध्यमिकचे कार्यालय संगणकीकृत करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे भविष्यात या विभागातील सर्व कामे संगणीकृत होतील व तक्रारी कमी होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माध्यमिक शिक्षण विभागाकडे कोर्ट मॅटर चे प्रकरणे भरपूर आहेत. त्यामुळे शिक्षण अधिकाऱ्याचा बराच वेळ मुंबईला हेलपाटे घालण्यात जातो. हे प्रमाण कमी आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शिक्षणाधिकारी जास्त वेळ कार्यालयात उपस्थित राहिल्यावर अनेक प्रलंबित बाबींचा निपटारा होतो. त्यामुळे या विभागाच्या प्रलंबित कामाबाबत मासिक आढावा बैठक घेतली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जगताप यांचे कौतुक…
खाजगी संस्थेच्या लिपिकाच्या कामासाठी शिक्षणाधिकारी जगताप शाळेत गेले ही बाब काही पत्रकारांनी त्यांच्या निदर्शनाला आणली. त्यावेळी सीईओ कुलदीप जंगम यांनी जगताप यांच्या या कृतीचे कौतुक केले. अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांच्या आदेशाची त्यांनी अंमलबजावणी केली आहे. त्यांच्या धाडसाचे कौतुक केले पाहिजे. न्यायालयीन प्रकरणात जे निर्णय येतात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यांनी अशाच पद्धतीने काम करावे अशी शिक्षकांचे अपेक्षा आहे.
पशुसंवर्धन, समाजकल्याण…
जिल्हा परिषदेच्या तक्रारी असलेल्या विभागाचे कामकाज सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता समाजकल्याण व पशुसंवर्धन विभागाकडे लक्ष देणार आहे. समाजकल्याणला कर्मचाऱ्यांची मागणी आहे. त्या अनुषंगाने कामकाजात सुधारणा होण्याविषयी पाहिले जाईल. पशुसंवर्धनचाही कारभार वाढला आहे. जिल्ह्यात दुभते पशुधन वाढले आहे. त्यामुळे पशुसंवर्धन डॉक्टरांची मागणी वाढली आहे. शासनाने रिक्त जागांवर नवे डॉक्टर दिले आहेत. या डॉक्टरांचे काम कसे चालते यावरही मॉनिटर केले जाणार आहे. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयात नसतात याकडेही पत्रकारांनी लक्ष वेधले. त्यावर सीईओ कुलदीप जंगम यांनी वरील भाष्य केले आहे.