सोलापूर : जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी नियमित सेवेत समायोजनबाबत राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी बुधवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
राज्य शासनाने आरोग्य विभागात राष्ट्रीय ग्रामीण व शहरी आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. ही योजना सुरू केल्यापासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेत कायम करण्याबाबत १४ मार्च २०२४ निर्णय घेण्यात आला आहे. पण अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. या निर्णयाच्या अंमलबजावणीकरीता मंगळवार दि. १९ ऑगस्टपासून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलनाची नोटीस दिली होती. त्यानुसार या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदावर काम करीत आहोत. १४ मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी यांना नियमित सेवेत समावेशन करणेसाठी शासननिर्णय निर्गमित झाला आहे. सव्वा वर्षे कालावधी होवूनही अंमलबजावणी होत नसलेने तसेच मानधनवाढ, बोनस, भविष्य निर्वाह निधी कपात, विमा, बदली धोरण मान्य होत नसलेने आरोग्य मंत्र्यांची भेट घेण्यात आली होती. आरोग्यमंत्र्यांनी संघटना शिष्टमंडळास समायोजन प्रक्रिया व विविध मागण्यांबाबत आश्वासन दिले होते. पण या आश्वासनाची पुर्तता न झाल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत लसिकरण सत्रासह इतर सर्व कामे, विविध अहवाल तसेच ऑनलाईन व ऑफलाईन स्वरुपाची सर्व कामे बंद पडली आहेत. काम बंद आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या प्रवेशदरासमोर जमून निदर्शने केली. मागण्या मान्य केल्याशिवाय कामावर न येण्याचा शासनाला इशारा देण्यात आला.

More Stories
Ai watch: जनावरांच्या डॉक्टरांनी वाढवली जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी
विनायक कोंड्याल होणार सोलापूरचे महापौर
नीट परीक्षेत सोलापूरच्या डॉक्टर पती– पत्नीचे देश पातळीवर यश