March 22, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

पर्यावरण संवर्धनात मंद्रूप ग्रामपंचायतचे मोठे योगदान; हरित यशोगाथा पुरस्कार प्रदान

सोलापूर : वाढती कारखानदारी व वाहनांचे प्रमाण यामुळे हवेतील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. यामुळे पृथ्वीवरील सजीवांना धोका असून झाडे लावल्याशिवाय याला पर्याय नाही. यामुळे शासन विविध स्तरावर प्रयत्न करत असून मंद्रूप ग्रामपंचायत पर्यावरण संवर्धनासाठी मोठे काम केले आहे, अशा शब्दात अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे महासंचालक डॉक्टर जयराज फाटक यांनी मंद्रूपकरांचे कौतुक करून मंद्रूप ग्रामपंचायततीला हरित यशोगाथा पुरस्कार प्रदान केला.

महाराष्ट्रात वातावरणीय कृती स्थानिकीकरणात उल्लेखनीय प्रयत्न आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई व युनिसेफ महाराष्ट्र सहाय्यित, महाराष्ट्र वाटर एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन कोयलिशन अंतर्गत पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन माझी वसुंधरा अभियान संचनालय यांच्या सहयोगाने गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे राज्यातील ग्रामपंचायती, नगरपंचायत, नगरपरिषद आणि महापालिकांना हरित यशोगाथा 2025 पुरस्कार वितरित करण्यात आले. यात राज्यातील दोन ग्रामपंचायती त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मंद्रूप व अहिल्यानगरमधील एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. मंद्रूप ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी नागेश जोडमोटे, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती आप्पाराव कोरे व मंद्रूप ग्रामपंचायत सदस्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे महासंचालक डॉ. जयराज पाठक, माजी वसुंधरा अभियानाचे संचालक सुधाकर बोबडे, वातावरणीय कक्षाचे संचालक अभिजीत घोरपडे, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे सचिव जयश्री भोज उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. जयराज फाटक यांनी वातावरणातील वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी झाडे लावण्याशिवाय पर्याय नाही. मंद्रूप ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धनासाठी केलेले वृक्ष संवर्धन कौतुकास्पद आहे. वातावरणातील ऑक्सिजन वाढवण्यासाठी मंद्रूप ग्रामपंचायतीने वड व पिंपळ वृक्षाची लागवड मोठ्या प्रमाणात केली व त्याचे संवर्धन करण्यासाठी सामाजिक संस्थांनी हातभार लावला. मंद्रूप ग्रामपंचायतची ही मोहीम कौतुकास्पद आहे, असा शब्दात गौरव केला.