April 15, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सरकारच्या लोककल्याणकारी योजना ठरताहेत वांझ: डॉ. श्रीपाल सबनीस

सोलापूर : राज्यात दररोज आत्महत्या होत आहेत. भोंदू बाबांचे पीक जोमात वाढत आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. आत्महत्या करत आहेत. गोरगरिबांचे कल्याण करू असे म्हणणाऱ्या या सरकारच्या प्रत्येक योजना वांझ ठरत आहेत, असा आरोप संमेलन अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केला.

कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड आयोजित तिसरे राज्यस्तरीय कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य संमेलन संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर उद्घाटक माधव गादेकर, माजी आ. बब्रुवान खंदाडे, अध्यक्ष बी. आर. कलवले, स्वागताध्यक्ष लक्ष्मण कारले, ललिता सबनीस, कुमार करजगी, डॉ. ऋत्विक जयकर, दिगंबर ढेपे, संयोजक भरतकुमार मोरे,महापौर नलिनी चंदिले, प्रा. भीमाशंकर बिराजदार, विजयकुमार कांबळे, श्रीकांत बोराडे यांची उपस्थिती होती. प्रारंभी संयोजक भारतकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी सबनीस म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी संत गाडगेबाबा, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात केले. शिक्षणाची गंगोत्री समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविली. कर्मवीरांच्या व्यक्तिमत्त्वात अनेक महापुरुषांचे विचार एकवटलेले दिसून येतात. यावेळी कुमार करजगी यांना जीवनगौरव पुरस्काराने तर डॉ. ऋत्विक जयकर (वैद्यकीय), ह.भ.प. विठ्ठल माने (धार्मिक), दिगंबर ढेपे (शैक्षणिक) यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला

या प्रसंगी दत्तात्रय इंगळे, विजयकुमार सोनवणे, प्रिया चौधरी, किशोर जाधव यांच्या साहित्यकृतीचे प्रकाशन झाले. दुपारच्या वेळेत ‘कर्मवीर भाऊराव पाटील यांची शैक्षणिक दृष्टी व सध्याचे शैक्षणिक धोरण’ या विषयावर डॉ. शिवाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला यात प्रा.डॉ. अनिता शिंदे, प्रा.डॉ. जयदथ जाधव, प्रा.डॉ. जयदेवी पवार, हे सहभागी झाले दुपारी कवी दत्तात्रय इंगळे यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या कवी संमेलनात शहर जिल्हा व राज्यातील जवळपास ७० कवी सहभागी झाले होते. याप्रसंगी नरेंद्र गुंडेली, दस्तगीर जमादार, भगवान चौगुले, राजश्री जाधव, सुरेश निकंबे यांची प्रमुख उपस्थिती होती.सायंकाळी राजेंद्र पाराध्ये (शैक्षणिक), नानासाहेब मोरे, देविदास कसबे (समाजभूषण,) अगंद जाधव (सामाजिक), ॲड. कोमल ढोबळे, ॲड. गोविंद सूर्यवंशी (विधी), नागनाथ गायकवाड, उत्तरेश्वर मठपती, किशोर जाधव (सर्व साहित्यिक), डॉ. सिद्धेश्वर करजखेडे (वैद्यकीय), दत्ता वाघमारे (उद्योग) यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ. अंजना गायकवाड यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बी. आर. कलवले यांनी केले. या कार्यक्रमास सोलापूर, धाराशिव, अकलूज, लातूर, पंढरपूर यासह नांदेड या भागातील साहित्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.