April 17, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूर झेडपी सीईओवर पुन्हा अन्याय… तुम्हाला काय वाटते?

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतून 18 महिन्यातच सीईओ कुलदीप जंगम यांची अन्यायकारक बदली झाल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेत काम केल्यानंतर यापूर्वीच्या अनेक आयएएस अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी पदावर संधी मिळाली आहे. वायचळ, आव्हाळे यांच्यानंतर जंगम यांच्या बदलीने ही परंपरा कायम सुरू राहिली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेत काम केल्यानंतर यापूर्वीच्या अनेक आयएएस अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी पदावर पदोन्नतीने काम करण्याची संधी मिळाली. कोरोना महामारीच्या काळात चांगले काम करूनही तसेच पदोन्नतीच्या यादीत पहिले नाव असतानाही वायचळ यांची जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदावर बदली झाली होती. याबाबत प्रसार माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर आएएस कमिटी व राज्य शासनाला याची दखल घ्यावी लागली होती. निवृत्तीनंतर वायचळ यांना कलेक्टर दर्जाच्या पदावर संधी देण्यात आली. त्यानंतर मनीषा आव्हाळे यांची बदली महापालिकेकडे आयुक्त म्हणून झाली. शासनाने हाच पायंडा जंगम यांच्या बाबतीत कायम पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अप्पर आयुक्त पदावर वर्णी लावली. आयुक्तपदी नियुक्ती झाली असती तर बरे झाले असते. अप्पर आयुक्त पदावर त्यांची नियुक्ती करून एक प्रकारे अन्याय केल्याची भावना कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

वास्तविक कुलदीप जंगम यांनी गेल्या 18 महिन्यात जिल्हा परिषदेसाठी चांगले काम केले आहे. महाराष्ट्र शासनाने सेवाकर्मी पुरस्कार देऊन नुकताच त्यांचा सन्मानही केला. या सन्मानानंतर त्यांना जिल्हाधिकारी पदावर संधी मिळेल अशी चर्चा होती. परंतु अद्याप त्यांच्या आधीच्या बॅचच्या अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळालेली नाही. त्यामुळे पदोन्नतीत जंगम यांच्यावरही अन्याय झाला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेतून बदलून जाताना त्यांना जिल्हाधिकारी पद मिळाले नाही. महापालिकेकडेच अप्पर आयुक्त पदावर बदली झाल्यामुळे ते नाराज दिसले.

पांडुरंगाची सेवा राहिली…

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी गतवर्षी आषाढी यात्रेचे चांगले नियोजन केले. वारकऱ्यांच्या सेवेत काहीही कमी पडू नये यासाठी त्यांनी रात्रंदिवस एक करून कष्ट घेतले. पांडुरंगाची अशाप्रकारे सेवा करण्याचा योग अद्भुतच म्हणावा लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. यावर्षीच्या वारीचे नियोजन त्यांनी सुरू केले होते. कर्मचाऱ्यांची पदोन्नती, नोकर भरती ही प्रक्रिया त्यांनी पारदर्शकपणे पार पाडली. सीनेच्या महापुराच्या वेळेस पूरग्रस्तांसाठी भोजन व निवासाची सोय त्यांनी उत्तम प्रकारे केली. सध्या त्यांनी आषाढी वारीच्या नियोजनावर लक्ष केंद्रित केले होते. पांडुरंगाची दुसऱ्यांदा सेवा करण्याचे भाग्य मिळत असल्याबाबत त्यांनी यापूर्वीच समाधान व्यक्त केले होते. बदली झाली तरी जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. पण बुधवारी दुपारी शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात जंगम यांच्याही बदलीचा आदेश निघाला. या आदेशाने जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनाही धक्का बसला आहे.