April 17, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

पहाटे तीन पर्यंत चालली बैठक तरी सकाळी झेडपीत राडाच रे बाबा

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सदस्य निवडी बिनविरोध होण्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, पक्षनेत्या रश्मी बागल यांनी पहाटे तीन पर्यंत बैठक घेऊन सर्वांशी चर्चा करून सदस्यांची नावे फायनल केली तरीही सकाळी जिल्हा परिषदेत राडा झालाच.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या 83 सदस्य निवडीसाठी बुधवार दिनांक 15 एप्रिल रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांप्रमाणे सदस्य निवडी बिनविरोध व्हाव्यात यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार आमदार सचिन कल्याणशेट्टी, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, पक्षनेत्या रश्मी बागल यांनी हॉटेल बालाजी सरोवर येथे बसून जिल्ह्यातील सर्वच नेत्यांशी नावे फायनल करताना चर्चा केली. आमदार कल्याणशेट्टी यांना अक्कलकोट तालुक्यातीलच नावे फायनल करताना अडचणी आल्या. पण स्वतः पक्षनेत्या रश्मी बागल यांनी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, दिलीप माने यांच्याशी संवाद साधून नावे फायनल केली. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सदस्यांनाही संधी देण्याचे ठरले. यासाठी पहाटे तीन पर्यंत ही बैठक चालली. सर्वांनी ओके म्हटल्यानंतरही निवडणूक लागलीच तर काय? यावरही चर्चा झाली. यासाठी कोल्हापूरच्या एका सल्लागाराला निमंत्रित करण्यात आले होते. त्या सल्लागाराने विषय समितीचे सदस्य निवडणुकीद्वारे निवडणे किती किचकट आहे हे समजावून सांगितले. विषय समितीचे सदस्यासाठी मतदान करताना इतरांकडून मोठ्या चुका होणार आहेत. त्यामुळे अनेक मते बाद होण्याचा धोका होता. त्यामुळे हा पर्याय टाळण्यावर एकमत झाले.

रात्री उशिरापर्यंत बैठक घेऊन सर्व खातरजमा झालेली असतानाही पक्षनेत्या रश्मी बागल सजग होत्या. सकाळी सव्वा आठ लाच तयार होऊन त्यांनी सर्वांशी संपर्क केला. जिल्हा परिषदेच्या सभागृहात सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिवराज मेत्रे व प्रवीण तानवडे यांनी परस्पर अर्ज घेऊन समाजकल्याण, अर्थ व बांधकाम आणि स्थायी समितीसाठी उमेदवारी दाखल केली. भाजप सह सर्वच सदस्यांची स्थायी व समाजकल्याणला मोठी पसंती होती. सर्वांना न्याय देणे निवड समितीला अशक्य होते. रात्रभर समजावून ही हा राडा झाल्याने पुन्हा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, पक्षनेत्या रश्मी बागल यांनी बालाजी सरोवर येथे बैठक घेतली. संबंधित सदस्यांची समजूत काढण्यात आली. त्यांच्या नेत्यांशी संवाद साधण्यात आला. मैत्री यांना दोन समिती तर तानवडे यांच्या पदरात एक समितीच असल्याने त्यांच्या विरोधाची धार वाढली होती. बागल यांनी यासाठी पुढाकार घेतला.  इतके करूनही निवडणूक होणारच असेल तर निधी देतानाही आम्ही विचार करू, असा इशारा देताच विरोध मावळला.  इकडे निवडणूक लागणार म्हणून प्रशासनावरही दबाव वाढला होता. पण निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर दोघांना अगोदर ज्या समितीत घेतले होते. आहे ती समितीपदरात पाडून घेण्याचे ठरले आणि तानवडे व मेत्रे यांनी दाखल केलेले फार्म काढून घेतले.