अक्कलकोट : तालुका कृषी अधिकारी कार्यालयास रात्री ८ वाजता(दि. 26) बोगस उडीद बियाणे विक्रीची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली.
स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र, शेळगांव (ता. परांडा, जि. धाराशिव) चे प्रोप्रायटर रत्नाकर रघुनाथ कोले यांनी निर्मल सीड्स प्रा. लि. कंपनीच्या उडीद वाण NUL 7 (विश्वास) बॅगची हुबेहूब नक्कल करून विक्रीसाठी आणलेली ४८ बॅग तसेच आबा कृषी सेवा केंद्र, अक्कलकोट येथील गोडाऊनमध्ये ठेवलेल्या ४३२ बॅग अशा एकूण ४८० बॅग (प्रति ५ किलो) जप्त करण्यात आल्या. या बोगस बियाण्यांची किंमत तब्बल ८,४६,७२० रुपये इतकी आहे, अशी माहिती जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांनी दिली आहे.
ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर शुक्रचार्य भोसले व कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्तरीय भरारी पथकाने केली. या मोहिमेत तालुका कृषी अधिकारी अक्कलकोट श्री. चंद्रकांत मंगरुळे, मोहीम अधिकारी अजय वगरे, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी बी.बी. बाबर, अशोक कांबळे तसेच निर्मल कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी श्री. वासुदेव नाटीकर उपस्थित होते. जप्त केलेल्या बोगस बियाणे विक्रेत्यावर रात्री उशिरा अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शेकडो शेतकरी फसवणुकीपासून वाचले असून कृषी विभागाने कठोर पावले उचलल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

More Stories
सोलापूर झेडपी पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ व ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप