March 3, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर होऊ देऊ नये: राज ठाकरे

सोलापूर : शरद पवार यांनी महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये याचे काळजी घ्यावी अशी टीका मनसेचे नेते राज ठाकरे यांनी सोमवारी सोलापुरात पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांनी पत्रकारांची संवाद साधला.  महाराष्ट्रात राजकीय वातावरण कलुषित  होत आहे याकडे पत्रकारांनी लक्ष वेधल्यावर मनसेचे नेते राज ठाकरे म्हणाले यात मीडियाची मोठी जबाबदारी आहे. समाजात जातीयतेचे विष करणाऱ्या नेत्यांचे भाषणे दाखवणे बंद करा. आपोआप यावर लगाम बसेल सोशल मीडियावर जे व्हायरल व्हायचंय ते होऊ द्या. जातीचा विचार न करता महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. यातून चांगला रोजगार व नोकऱ्या निर्माण झाल्या पाहिजेत. पण आज स्थिती काय आहे. इतर राज्यातील मुलं महाराष्ट्रात येऊन शिक्षण घेतात व नोकऱ्या बळकवतात. हे कशामुळे झाले. खाजगी संस्था कोणाच्या हातात आहेत. पैसा द्या आणि डिगऱ्या घ्या.  या संस्थांमध्ये आरक्षण आहे का? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. एक काळ असा होता की महाराष्ट्र देशाला दिशा देत होता. पण आज मतासाठी राजकारण इतके घाणेरडे झाले आहे की आरोपांची पातळी खालावली आहे. सामान्य लोकांच्या गरजा काय आहेत याकडे पाहण्याला कोणाला वेळ नाही. केवळ मतासाठी जातीयतेचे विष पेरणाऱ्या राजकारण्यांना  लोकांनीच धडा शिकवला पाहिजे. अशा राजकारण्यांना या निवडणुकीतून हद्दपार करा, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रात सध्या जे राजकारण सुरू आहे त्यावर बोलताना राज ठाकरे यांनी शरद पवार यांना महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे का हे त्याने ठरवावे असा टोला मारला.

मनसे विधानसभा निवडणुकीत उतरणार आहे. त्याची चाचणी करण्यासाठी हा दौरा आहे. किती जागा व कशा लढवायच्या हे ठरवण्यासाठी राज्यभर दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.