March 5, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

केंद्रीय पथकातील अधिकाऱ्याने बीबीदारफळला जेसीबीने खोदून तपासली पाईप

सोलापूर : जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या कामांना गती द्या. लोकांना योजनेचा लाभ मिळू द्या, कामांच्या दर्जावर लक्ष ठेवा. पाणी गुणवत्ता सांभाळा. गावस्तरीय पाणी व स्वच्छता समिती बळकट करा, अशा सूचना केंद्र शासनाचे पाणी व स्वच्छता सल्लागार शिष्यपाळ शेठी यांनी सोलापूर झेडपीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

जल जीवन मिशनच्या कामाच्या सोलापूर जिल्ह्य पाहणी दौऱ्यासाठी शिष्यपाल शेठी आले आहेत. बुधवारी त्यांनी जिल्हा परिषदेला भेट देऊन जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी बीबीदारफळ ग्रामपंचायतीस भेट दिली. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, उपकार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, उत्तर सोलापूरचे गटविकास अधिकारी राजाराम भोंग जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सहाय्यक लेखा बापू शेंडगे यांच्यासह उप अभियंता योगीराज बेंबळगी, नाबार्डचे महेश शिरपूर, पी. एच कुलकर्णी, सचिन सोनवणे , शाखा अभियंता जयवंत जाधव यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी सोलापूर जिल्ह्यातील जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनच्या कामांची माहिती दिली. निधीअभावी अनेक कामांच्या प्रगतीवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी जलजीवन मिशनच्या कामांची परिपूर्ण माहिती देऊन फोटोसह सादरीकरण केले. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे मार्गदर्शनाखाली योजना पुर्णात्वास नेत असल्याचे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी सांगितले.

बिबीदारफळ ग्रामपंचायत येथे ग्रामस्थांशी संवाद साधला. सरपंच अर्चना ननवरे, उपसरपंच नारायण सर्वगोड उपस्थित होते. गावातील पाण्याची विहीर व पाईपलाईन तसेच पाण्याच्या टाकीची पाहणी केली. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सार्वजनिक शौचालय व वैयक्तिक शौचालयांची पाहणी केली. बीबीदारफळ तलावातून अकोलेकाटी ग्रामपंचायतीस पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेची पाहणी शिष्यपाल शेठी यांनी केली.

दुष्काळामुळे होत आहे अडचण..

याप्रसंगी कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी सर्व कामांची परिपूर्ण माहिती दिली. उप कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी इंग्रजी व हिंदीतून सोलापूर जिल्हा दुष्काळी स्थितीमुळे पाण्याचे स्त्रोत वारंवार बदलत असल्याचे निदर्शनास आणून दिले. लोकसंख्या वाढीमुळे पाण्याची मागणी वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले. मोनिका दिनकर, आम्रपाली. गजघाटे यांनी पाणी व स्वच्छता समितीची माहिती दिली. पाणी गुणवत्तेची माहिती सोनाली कुलकर्णी यांनी दिली.