February 21, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी ८५० कोटींची नवी योजना; एमआयडीसीत आयटी पार्क

सोलापूर : सोलापूरमध्ये आयटी पार्क उभे केल्यास युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. जिल्हा प्रशासनाने उत्तम जागा शोधल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आयटी पार्क उभारण्यात येईल आणि इथे आयटी उद्योग आणण्यात येतील. शहरात उद्योगासाठी आवश्यक चांगले रस्ते आणि विमानसेवा उपलब्ध झाल्याने इथल्या औद्योागिक विकासावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)अंतर्गत म्हाडातर्फे उभारण्यात आलेल्या दहिटणे येथील राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेअंतर्गत १ हजार १२८ आणि शेळगी येथील श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रीय समाज महालक्ष्मी गृहनिर्माण सहकारी संस्थेअंतर्गत २२० अशा एकूण १ हजार ३४८ सदनिकांच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, समाधान आवताडे, दिलीप सोपल, सचिन कल्याणशेट्टी, अभिजित पाटील, देवेंद्र कोठे, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सोलपूरमध्ये बंद जलवाहिनीने पाणी आणण्यात येणार आहे. सांडपाणी प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न दूर करण्यात आला असून ते कामही सुरू करण्यात आले आहे. शहरातील जलवितरण वाहिनीच्या ८५० कोटीच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. सोलापूर शहरातील नागरिकांना दररोज शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, असे प्रयत्न करण्यात येत आहेत. विमानतळाचे अतिरिक्त कामही लवकरच करण्यात येणार आहे असे ते म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या समस्या दूर करतांना सामान्य माणसाला हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. त्याअंतर्गत पीपीपीच्या माध्यमातून काही प्रकल्प हाती घेण्यात आले, त्यातील हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाला अटल बांधकाम योजनेतून २ लाख रुपये देण्यात आले. हरितपट्टयात मान्यता दिल्याने जागेची किंमत कमी झाली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनुदान मिळाले. त्यामुळे लाभार्थ्याला कमी दरात घरकूल उपलब्ध झाले आहे. लाभार्थ्याला घरभाड्या एवढाच बँकेचा हप्ता भरावा लागणार आहे आणि घर त्याच्या नावाने होईल असे नियोजन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केवळ सोलापूरमध्ये ४८ हजार घरांचे नियोजन करण्यात आले आहे, त्यापैकी २५ हजार घरांचे काम पूर्ण करण्यात आले. २० हजार घरांचे नगारिकांना वितरण करण्यात आले आणि उर्वरीत घरांचे काम सुरू आहे. याकरिता प्रधानमंत्री यांनी १ हजार कोटी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गरिबाच्या घराचे स्वप्न पुर्ण करता येणार आहे. ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० लाख घरकुलांना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे २०१८ पर्यंत प्रतिक्षा यादीतील सर्व नागरिकांना घरे देण्यात येणार आहे. देशात सर्वाधिक वेगाने घरे ग्रामविकास विभागामार्फत उभारण्यात येत आहेत. २० लाखापेक्षा अधिक घरांचे काम सुरू करण्यात आले आहे. पुढील दोन वर्षात सर्व ३० लाख कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण होईल. २०१८ च्या यादीतून सुटलेल्या नागरिकांसाठी नव्याने नोंदणी करण्याची परवानगी मिळाल्याने त्यांनाही लवकरच केंद्र सरकारच्या माध्यमातून घरकूल मिळेल. महाराष्ट्र हे पहिले बेघरमुक्त राज्य करायचे आहे. या ३० लाख घरांना केंद्र सरकारच्या अनुदानासोबत राज्य सरकार ५० हजार रुपये देईल आणि प्रत्येक घरावर सौर ऊर्जेचा वापर करून त्यांना मोफत वीज उपलब्ध होईल. याच पद्धतीने सुंदर घरे उभारून गृहनिर्माण क्षेत्रात ‘सोलापूर पॅटर्न’ तयार झाला आहे. एखाद्या खाजगी विकासकाच्या प्रकल्पालाही लाजवेल अशी घरे उभारण्यात आली आहे. सोलापूरने महाराष्ट्राला गरजूंना कमी खर्चात दर्जेदार घरे देण्यासंदर्भात दिशा दाखवली आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी प्रकल्पाचे कौतुक केले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळानतर्फे धनादेश वितरणासंदर्भात बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, महामंडळाने अडीच हजार लोकांना कर्ज देऊन स्वावलंबी उद्योजक होण्यास मदत केली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजात उद्योजक तयार करायचे आहेत. महामंडळाच्या माध्यमातून राज्यात १ लाख ५२ हजार उद्योजक तयार झाले असून आणि सुमारे १३ हजार कोटी उपलब्ध करून दिले आहेत. इतरांना रोजगार देणारा उद्योजक उभा रहात असल्याचे समाधान असल्याचे फडणवीस म्हणाले.

गृहनिर्माण प्रकल्पांमुळे सोलापूर शहराच्या वैभवात भर पडली असून सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण झाल्याचे नमूद करून पालकमंत्री गोरे म्हणाले. या दोन्ही प्रकल्पांमुळे साडेतेराशे कुटुंबांना हक्काचे घर वाजवी किंमतीत मिळणार आहे. प्रकल्पांतर्गत सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यापूर्वी पंधरा हजार घरांचा प्रकल्प पूर्ण करण्यात आला होता. शहरी आणि ग्रामीण नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचे शासनाचे प्रयत्न आहे. राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दहा वर्षात १० लाख २६ हजार घरे सामान्य नागरिकांना देण्यात आले. मात्र गेल्या सहा महिन्यात गरजूंसाठी ३० लाख घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे.

 

सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. समांतर जलवाहिनीमुळे शहरातील पाणी समस्या दूर होण्यास मदत झाली आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जागेची समस्या दूर झाल्याने लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल. शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्थेसाठी ८७२ रुपयांचा आरखडा तयार करण्यात आला आहे. सोलपूर-गोवा विमानसेवाही सुरू करण्यात आली आहे. सोलापूर येथून मुंबई आणि पुणे विमानसेवा सुरू व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘माझं सोलापूर, सुंदर सोलापूर’ हा संकल्प करण्यात आला असून शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी आमदार विजय देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले. दोन्ही गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत घरांचे काम अत्यंत चांगले झाले असून लाभार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. सोलापूर शहरात रस्ते, आरोग्य आदी चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत. सोलापूर शहरात मुलभूत सुविधांसोबत शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. येत्या काळात शहराचा औद्योगिक विकासही होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोलापूर येथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी तसेच येथील बेरोजगार तरुण येथे स्थलांतर थांबावे यासाठी मोठा उद्योग देण्याची मागणी त्यांनी केली.

प्रास्ताविकात श्री.शंभरकर यांनी गृहनिर्माण संस्थेची माहिती दिली. असंघटीत क्षेत्रातील कामगार, रिक्षाचालक, भाजी विक्रेते यांच्यासाठी या गृहप्रकल्पांतर्गत हक्काचे घर उपलब्ध होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील दहिटणे येथील राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये ५० इमारतींतून ३२७ चौ. फुटांच्या १ हजार २०० स्वयंपूर्ण सदनिका उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या गृहप्रकल्पांतर्गत आतापर्यंत १ हजार १२८ सदनिकांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच सोलापूर महानगर पालिकेच्या हद्दीतील शेळगी येथील श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रीय समाज महालक्ष्मी या गृहनिर्माण संस्थेअंतर्गत ८ इमारतींची उभारणी करण्यात येत आहे यामध्ये एकूण २५२ सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी २२० सदनिकांचे काम अद्यापपर्यंत पूर्ण झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. असंघटित क्षेत्रातील ८११ बांधकाम मजुरांना कामगार विभागामार्फत रु. २ लाखांचे अतिरिक्त अनुदान प्राप्त झाले असल्याने त्यांना स्वस्तात घरकूल उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते प्रातिनिधीक स्वरुपात घरकूलाच्या १० लाभार्थ्यांना चावीचे वितरण करण्यात आले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे ४ लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या धनादेशाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सोलापूर सोशल फाऊडेशनतर्फे आयोजित होणाऱ्या सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरणही फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला माजी आमदार राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त डॉ.सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे सह मुख्य अधिकारी विजय वाघ, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे, राष्ट्र तेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रीय समाज महालक्ष्मी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास घरकुल लाभार्थी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे यांनी आभार मानले.