सोलापूर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान तर 7 फेब्रुवारी ऐवजी 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल.
राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांच्यी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात 28 ते 30 जानेवारीपर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी रोजी प्रसिद्ध करतील. आता 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता होईल. संबंधित ठिकाणी 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात 11 फेब्रुवारीपर्यंत प्रसिद्ध केली जातील.

More Stories
आज दारातील पौर्णिमा… तुम्हाला महत्व माहित आहे का?
सोलापूर मनपा भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड
सोलापुरात एजंटने परिमंडळ कार्यालयात घुसून घातला गोंधळ