सोलापूर : महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेतील तेजस्वी संत व्यक्तिमत्त्व असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध आध्यात्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” हा विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम श्री सरस्वती मंदिर प्रशालेत संपन्न झाला.
उद्घाटन प्रसंगी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी किर्तन भजन व प्रबोधन परंपरा समाजाला आवश्यक असून शासन आध्यात्मिक परंपरा जतन करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे प्रतिपादन केले. याप्रसंगी शेलार यांनी सोलापूर परिसरातील भजनी मंडळांना भांडवली अनुदान वाटप केले.
संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी, भावार्थदीपिका यांसारख्या ग्रंथांद्वारे अध्यात्म आणि तत्त्वज्ञान सर्वसामान्यांच्या बोलीभाषेत मांडले. समता, प्रेम, भक्ती आणि मानवतेचा संदेश देत त्यांनी समाजमनात प्रबोधनाची ज्योत पेटवली. त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक जीवनावर स्पष्टपणे जाणवतो. त्यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित हा कार्यक्रम त्यांच्या विचारसंपदेचा आणि संतपरंपरेचा गौरव करणारा ठरणार आहे. या कार्यक्रमात “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” या संकल्पनेवर आधारित विशेष सादरीकरण झाले. स्वास्थ्य व समाज विषयक प्रबोधनकार गणेश शिंदे यांनी संत ज्ञानेश्वरांच्या अध्यात्मदर्शनावर आणि त्यांच्या विचारांच्या सामाजिक परिणामांवर आधारित प्रेरणादायी व्याख्यान दिले. त्यांच्या मार्गदर्शनातून ज्ञानयोग, भक्तियोग आणि समाजप्रबोधन या संत परंपरेतील महत्त्वपूर्ण मूल्यांचा उलगडा झाला. संतपरंपरेचे संवर्धन, सांस्कृतिक वारशाचे जतन आणि समाजात आध्यात्मिक जागर निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रमास सोलापूर व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, संत साहित्याचे अभ्यासक तसेच भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

More Stories
माढा तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फलोत्पादन मंत्री गोगावले यांच्याकडून पाहणी
सोलापुरात रमजान ईद उत्साहाने साजरी
सोलापुरात पुढील वर्षापासून बोर्डाचे पेपर ठेवणार पोलीस कोठडीत