July 8, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापुरातील माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात भरणार

सोलापूर: राज्य सरकारच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या एसआयआर (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) या राष्ट्रीय मोहिमेच्या कामात कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नसून, नियुक्त बीएलओ म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांनी 31 जुलैपर्यंत सर्व माहिती संकलनाचे काम पूर्ण करावे, यासाठी गुरुवार दि. 9 जुलैपासून माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे स्पष्ट निर्देश माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील sir चे शिक्षकांची  जिल्हाधिकारी एस कार्तिकेन यांच्या आदेशानुसार माध्यमिक शिक्षण विभागातील अनेक शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने विशेष नियोजन केले आहे. यानुसार सर्व शाळांनी सकाळी ७ ते ११ या वेळेत नियमित अध्यापन व शैक्षणिक उपक्रम पूर्ण करावेत. त्यानंतर नियुक्त शिक्षकांनी दिवसभर बीएलओ म्हणून एसआयआर मोहिमेचे काम युद्धपातळीवर पार पाडावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येणार नाही, तसेच राष्ट्रीय मोहिमेचे उद्दिष्टही वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास शिक्षणाधिकारी जगताप यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी बीएलओ म्हणून नियुक्त शिक्षकांना इतर कामे देऊ नयेत, असे निर्देश दिले होते. मात्र काही शाळांमध्ये अध्यापनावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिक्षण विभागाने सकाळी अध्यापन आणि त्यानंतर बीएलओ कामकाज असा समन्वयाचा मार्ग काढला आहे. दरम्यान काही शिक्षक tet ला विरोध करत गुरुवारी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कोणत्याही शिक्षकांनी या आंदोलनात सहभागी न होता प्रशासनाला सहकार्य करावे व आपले कार्य वेळेत पार पाडावे, असे आवाहन शिक्षण अधिकारी जगताप यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांची बैठक घेऊन सर्व शाळांना तसे पत्र पाठवले आहे. मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी माने यांनीही सकाळच्या सत्रात शाळा भरून दुपारच्या सत्रात बीएलओचे काम करण्यास मुभा दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

सोलापूरचे यातही नाव व्हावे…

Sir बाबत बीएलओ नी ३१ जुलैपर्यंत सर्व माहिती संकलित करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात आघाडीवर असलेल्या सोलापूर जिल्ह्याने एसआयआर राष्ट्रीय मोहिमेतही उत्कृष्ट कामगिरी करावी, यासाठी सर्व शिक्षकांनी जबाबदारीने आणि समन्वयाने काम करावे, अशीअपेक्षा माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी व्यक्त केली आहे.

अन्यथा नियमानुसार कारवाई   

टीईटी परीक्षेच्या विरोधात समन्वय समितीच्या शाळा बंद आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांवर शासनाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी या आंदोलनात सहभागी न होता, अध्यापन व sir मोहिमेचे कामकाज पूर्ण करावे असे आवाहन शिक्षणाधिकारी जगताप यांनी केले आहे.