झेडपीच्या योजना गरीबापर्यंत पोहोचवण्यात पत्रकारांचे मोठे योगदान: सीईओ कुलदीप जंगम

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात. या योजना गरीबापर्यंत पोचविण्यात पत्रकारांचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांनी केले.
जिल्हा परिषद प्रशासनातर्फे मराठी पत्रकार दिनानिमित्त झेडपी बीटवरील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन सीईओ कुलदीप जंगम यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याहस्ते झेडपी बीटवरील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मनिषा वाकडे, सोलापूर जिल्हा परिषद बीट पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर गोतसुर्वे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, राज्य पत्रकार अधिस्विकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके, सचिव बगले, खजिनदार मनोज भालेराव प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास या एकाच ध्येयासाठी आपण सर्वजण मिळून काम करीत आहोत. लोकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात. ज्या गोरगरीब जनतेपर्यंत सुविधा पोहचू शकत नाहीत. अशापर्यंत माहिती पोहोचविण्याचे काम पत्रकार करतात. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून कामकाजाबाबत सर्वच माहिती मिळते असे नाही. बातमीच्या माध्यमातून पत्रकाराकडून प्रशासनाला माहिती मिळते. त्यामुळे काम करणे सोपे जाते. जिल्हा परिषदेच्या कामाला गती येण्यासाठी आम्ही पत्रकारांना सोडू शकत नाही आणि चांगली विकासाची बातमीदारी करण्यासाठी पत्रकार आम्हाला सोडू शकत नाहीत अशा शब्दात पत्रकार व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या नात्याबाबत सीईओ जंगम यांनी अपेक्षा व्यक्त केली. जिल्ह्याच्या विकासाला दिशा देण्यासाठी सहकार्य करा. आम्ही आमच्या कार्यपद्धतीत सुधारणा करू, अशी ग्वाही सीईओ कुलदीप जंगम यांनी यावेळी दिली.
सध्या जिल्हा परिषदेचे पदाधिकारी नसल्याने पत्रकार हेच प्रशासनाचे कान व डोळे आहेत. क्षेत्रीयस्तरावर काय घडते याचा फिडबॅक देण्याचे काम पत्रकार करतात. सर्वजण जिल्हा परिषदेच्या विकास कामासाठी एकत्र येत असताना सकारात्मक चांगल्या संकल्पना निदर्शनास आणून द्या, असे आवाहन अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांनी केले. स्वातंत्र्याच्या चळवळीपासून ते आतापर्यंत लोकशाहीत पत्रकारांचे योगदान महत्वाचे राहिले आहे. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्याा विकासकामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासनास महत्वाची मदत होत असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीयसहाय्यक सुधाकर माने- देशमुख,सहाय्यक प्रशासन अधिकारी अनिल जगताप, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन साळुंखे, सीईओ कक्षातील वरिष्ठ सहाय्यक सुरज नदाफ, कनिष्ठ सहाय्यक अकेले यांनी परिश्रम घेतले. प्रास्तविक व सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. संवाद सल्लागार सचिन सोनवणे, जनसंपर्क कक्षातील सहाय्यक मेहताब शेख यांनी आभार मानले.