सोलापूर : देशभक्तीपर गीत, सनईचे मंगल सुर, वऱ्हाडींची लगबग, मंगळवारी गोरज मुहूर्तावर १२ जोडप्यांच्या रेशीमगाठी बांधल्या गेल्या. निमित्त होते स्वस्तिक सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे.
स्वस्तिक सामाजिक संस्थेच्यावतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा भवानी पेठेतील वीरतपस्वी सांस्कृतिक भवन येथे काशीपिठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यामध्ये संपन्न झाला. वीरतपस्वी प्रशालेत सर्व वधू-वरांना देण्यात येणारा रुखवत सजवून ठेवण्यात आला होता. भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक डॉ.किरण देशमुख आणि त्यांच्या पत्नी डॉ.उर्वशी देशमुख यांनी प्रत्येक नवरी मुलीचे कन्यादान केले.संस्थेच्या वतीने वधू-वरांना कपाट, मणी मंगळसूत्र,संसार उपयोगी वस्तू,साडी, शालू,जोडवी,सफारी इतर आवश्यक वस्तू देण्यात आल्या. विवाह समारंभासाठी ५ हजार जणांच्या भोजनाची सोय करण्यात आली होती.समाजातील गोरगरीब वर्गातील लोकांसाठी सामुदायिक विवाह सोहळा सातत्याने झाले पाहिजे. स्वस्तिक सामाजिक संस्था मागील अनेक वर्षापासून आरोग्य, शिक्षण, विवाह सोहळा या धार्मिक कार्यात अग्रभागी असते. येणाऱ्या गृहस्थाश्रम जीवनामध्ये वधू-वरांनी एकमेकांना समजून घेण्याचे वचन घ्यावे व पुढील सामुदायिक विवाह सोहळ्यात स्वयंसेवक म्हणून काम करावे. त्याचबरोबर आज आपल्या देशाला ज्यांनी संरक्षण दिले अशा सैनिकांचा सन्मान झाला याचाही आनंद होत असल्याची भावना काशीचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी यावेळी व्यक्त केली.
सामुदायिक विवाह सोहळा ही एक चळवळ आहे. समाजातल्या शेवटच्या घटकांना आपल्या माध्यमातून हवी ती मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्वसामान्य परिवारातील नियोजित वधू-वरांसाठी असे सोहळे आणि चळवळ चालू राहिली पाहिजे, अशी भावना वधू-वरांना आशीर्वाद देत आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली.या विवाह सोहळ्यात वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी ष. ब्र.श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी नागणसूर, माजी खासदार ष. ब्र.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी गौडगाव,ष. ब्र.नीलकंठ शिवाचार्य महास्वामींची मैंदर्गी, यांच्यासह आ.विजयकुमार देशमुख,आ. सुभाष देशमुख,मूर्तिजापूरचे आ.हरीश पिंपळे, माजी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे,पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, वीरतपस्वी शिक्षण संकुलचे सेक्रेटरी शांताया स्वामी, उद्योजक वेंकटेश चाटला, प्रमोद मोरे, संजय कोळी, पापशेट दायमा, सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू, विजया वड्डेपल्ली, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, विठ्ठलदास गजम, मल्लिकार्जुन मारता, सिद्धया स्वामी हिरेमठ, चिदानंद वनारोटे, शिवानंद मेंडके, सोमनाथ भोगडे, सुधीर थोबडे, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे, नरसिंहस्वामी मामड्याल, श्रीशैल हत्तुरे, राजेंद्र गड्डम पंतलु उपस्थित होते.परमेश्वर हिरेमठ यांनी पौरोहित्य केले तर शिवाजी रानसर्जे यांनी सूत्रसंचालन केले.
माजी सैनिकांचा सन्मान
ऑपरेशन सिंदूरच्या धर्तीवर या विवाह सोहळ्यात संरक्षण दलातील माजी सैनिकांचा हातात तिरंगा ध्वज देऊन शाल फेटा आणि भेटवस्तू देऊन ३० वर्षापासून देशाची सेवा बजावलेल्या जवानांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान करून सैनिकाप्रती कृतार्थ झाल्याची भावना काशी जगद्गुरु श्री विश्वराध्य डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी व्यक्त केले. माजी सैनिक महेश सिद्राम बुध्दे,ओमशंकर अण्णाप्पा निलंगी,उमेश सौदागरे,अर्जुन पवार,रमेश सुतार, सोमलिंग कोरे,कल्याण फुलारी,रावण धावरे,आनंद म्हाळप्पा बनसोडे, बाबर रुस्तम खान पटेल या माजी सैनिकांचा सन्मान झाला.

More Stories
सोलापूरच्या वाहन मालकाकडून 35 हजाराची लाच घेताना पुण्याचा फौजदार अटकेत
युरोपमधील “पॅरिसमहल’ मध्ये शेतकऱ्यांनी साजरी केली शिवजयंती
सोलापूर महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाला पहिल्याच सभेत नामुष्की