सोलापूर : मुख्यमंत्री सडक, काम बेधडक पुन्हा दे धडक, अशी अवस्था सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांची झाली आहे. प्रधानमंत्री सडक योजनेनंतर अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री सडक योजनेची यंत्रणा डळमळीत होत असल्यामुळे सामान्य जनतेतून आता नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. रस्ता झाल्यानंतर पाच वर्षे या रस्त्याकडे न फिरणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांकडून बोगस बिल काढल्याचा संशय आता व्यक्त होत आहे .
मुख्यमंत्री सडक योजनेतून वाड्यावर त्यांना जोडणारे चांगले मजबूत रस्ते होऊ लागल्याने ही योजना अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. या योजनेतून गावाला वाड्यावर त्यांनी जोडणारे अनेक रस्ते तयार करण्यात येत आहेत. योजनेला मोठ्या प्रमाणावर निधी असल्यामुळे बांधण्यात येणारे असे छोटे रस्ते गुणवत्तापूर्ण असल्यामुळे लोकांच्या पसंतीला पात्र झाले आहेत. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात असे अनेक रस्ते तयार झाले. आपल्याही वस्तीला जोडणारा असा रस्ता व्हावा म्हणून लोकांची मुख्यमंत्री सडक काम बेधडक म्हणत योजनेसाठी मागणी वाढली. असे चित्र असताना आता मुख्यमंत्री सडक योजना अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे लोकांच्या मनातून उतरू लागली आहे.
मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा कार्यक्रम ठरलेला आहे. ठेकेदाराला निविदा मंजूर करतानाच या अटी घातल्या जातात. पण नंतर या अटीचे पालन होते का याची पाहणी करणारी यंत्रणाच या योजनेच्या कार्यालयाकडे नसल्याचे आता दिसून येत आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे ही योजना आता लोकांच्या मनातून उतरू लागले आहे. अनेक रस्त्यांची देखभाल दुरुस्ती झालीच नाही. त्यामुळे अशा रस्त्यांची आता वाताहत झाली आहे. या रस्त्यावरून लोकांना आता धड चालताही येणे अशक्य झाले आहे. दक्षिण सोलापुरातील टाकळी बरूर व मंद्रूप हनुमाननगर रस्त्याची पाहणी केल्यानंतर हे वास्तव समोर आले आहे.
काय असतात रस्त्याच्या अटी…
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ता मंजूर केल्यानंतर दोष दायित्व कालावधी अंतर्गत पाच वर्षाकरिता देखभाल व दुरुस्तीचे जबाबदारी दिली जाते. यामध्ये पावसामुळे पडलेल्या भेगांची दुरुस्ती करणे बाजू पट्ट्यांचे दुरुस्ती करणे डांबरी रस्त्यावर खड्डे पडले असतील तर दुरुस्ती करणे पाईप व मोर यांची देखभाल व दुरुस्ती करणे रस्त्यांच्या गटारपट्ट्यांचे देखभाल व दुरुस्ती करणे दक्षता फलक, देखभाल व दुरुस्ती करणे. ठेका देताना अशा अटी असताना काम केल्यानंतर पाच वर्षात ठेकेदार या रस्त्यांकडे फिरकले नसल्याचे दिसून आले आहे.
काय आहे अवस्था…
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंद्रूप ते हनुमान नगर हा 2.520 किलोमीटर चा रस्ता मंजूर करण्यात आला. श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस ला या कामाचा ठेका देण्यात आला. 20 मार्च 2019 ते 19 मार्च 2024 या कालावधीत या ठेकेदाराने या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी होती. काम झाल्यानंतर हा ठेकेदार या रस्त्याकडे फिरकला नसल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे देखभाल व दुरुस्ती दाखवून बोगस बिले काढल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

More Stories
राज्यातील सर्व महिलांना लखपती दीदी बनविणार: जयकुमार गोरे
तुम्हाला बैलगाडी, घोंगडी हवी आहेत का? मग या ठिकाणी भेट द्या
सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित योजनेचा लाभ