सोलापूर: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत “मिशन स्वाभिमान” अंतर्गत विशेष कर संकलन करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा गुरुवारी जिल्हा परिषदेत विशेष सन्मान करण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत “मिशन स्वाभिमान” ही विशेष कर संकलन मोहीम जिल्हा परिषद सोलापूरमार्फत राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश ग्रामपंचायतींच्या स्वारस्यपूर्ण सहभागातून 100% कर संकलन साध्य करणे असून, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये मार्च 2026 अखेरपर्यंत हे उद्दिष्ट गाठण्याचा निर्धार आहे.विशेष कर संकलन दिन या मोहिमेअंतर्गत दिनांक १४ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विशेष कर संकलन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी अधिकाधिक कर संकलन करणाऱ्या प्रत्येक तालुक्यातील 3000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या तीन ग्रामपंचायती व 3000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तीन ग्रामपंचायतींना प्रशस्तीपत्र देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या हस्ते सरपंचांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी, स्मिता पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, सहाय्यक गटविकास अधिकारी बी.सी. पाटील आधी उपस्थित होते. या कार्यक्रमास उत्कृष्ट कर वसुली करणारे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व एक ग्रामपंचायत कर्मचारी यांना आमंत्रित करण्यात आले होते. “मिशन स्वाभिमान कार्यक्रमाचे संचालन शिवराज राठोड व सुहास चेळेकर यांनी केले. आभार स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी मानले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानमध्ये आपल्या जिल्हातील ग्रामपंचायतीचा राज्यात पहिल्या क्रमांक मिळवणे हे आपले अंतिम ध्येय असून यासाठी आपल्याला जिल्हा प्रशासन सहकार्य करण्यास तयार आहे सांगितले.सुर्यकांत भुजबळ यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत “मिशन स्वाभिमान” विशेष कर संकलन मोहीम ही आपल्या जिल्हा परिषदेची नाविन्यपूर्ण उपक्रम असून हा पहिला टप्पा असून यापुढे दुसरा टप्पा दिनांक १५ नोव्हेबरनंतर राबविणार आहोत.तरी आपल्या कर संकलन वसुली मोहिमेमध्ये सातत्य कायम ठेवण्यात यावे असे आवाहन केले.
“माझा गाव माझे तीर्थ” मोहीम
गावातून कामानिमित बाहेर गावी गेलेले,उच्च पदावर कार्यरत असणारे ,वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक केलेल्या भूमिपुत्राकडून लोकवर्गणी जमा करून गावातील शाळा,अंगणवाडी ,ग्रामपंचायत बळकटीकरण करण्यासाठी “माझा गाव माझे तीर्थ ’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुजबळ यांनी सांगितले.
