सोलापूर : शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी व इतर मागण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी रविवारी मूक मोर्चा काढला.
स्पार्क चौकातील चार पुतळा येथून मोर्चाला सुरुवात झाली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चेकरी शिक्षकाच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या समवेत राज्यातील सर्व संघटनांची नागपूर येथील १ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीतील मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सर्व आस्थापनेतील कार्यरत इयत्ता १ ली ते ८ वी च्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य असल्याचा निर्णय दिलेला आहे. नागपूरच्या बैठकीत मंत्री भोयर यांनी राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करेल, अशी ग्वाही सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना दिली होती. त्यामुळे ४ ऑक्टोबरचा मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात दि.२३ ऑक्टोबर अखेर पुनर्विचार याचिका दाखल न केल्याने राज्यातील सर्व माध्यमांच्या शिक्षकांच्या मनात राज्य शासनाच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने ‘ सोलापूर जिल्ह्यातील हजारो शिक्षकांचा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला आहे.
मुक मोर्चाद्वारे राज्य शासनाने TET संदर्भात तातडीने मान. सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल कारावी व गरज भासल्यास केंद्र शासनाने RTE Act मध्ये दुरुस्ती करण्यास पाठपुरावा करावा.१५ मार्च २०२४ ची सुधारीत संचमान्यता शासन निर्णय रद्द करावा. सर्व शिक्षकांना जूनी पेन्शन योजना लागू करा. शिक्षकांना दिली जाणारी सर्व ऑनलाईन कामे बंद करा. राज्यातील सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी. शिक्षणसेवक योजना रद्द करावी. वस्तीशाळा शिक्षकांची मुळ सेवा सेवाकालावधीसाठी ग्राहय धरावी, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

More Stories
Ai watch: जनावरांच्या डॉक्टरांनी वाढवली जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी
विनायक कोंड्याल होणार सोलापूरचे महापौर
नीट परीक्षेत सोलापूरच्या डॉक्टर पती– पत्नीचे देश पातळीवर यश