March 11, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

 ‘स्टॉप कॅन्सर’ कार्यशाळेत महिलांना मिळाले कॅन्सर प्रतिबंधासाठी ज्ञान

सोलापूर: महिला दिनाच्यानिमित्ताने माढा तालुक्यातील बारलोणी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागलवस्ती शाळेत महिलांमध्ये कॅन्सर विषयी जागृती करण्याच्या उद्देशाने “स्टॉप कॅन्सर’ कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यशाळेत कॅन्सर होण्याची कारणे, कॅन्सर ची प्राथमिक लक्षणे, कॅन्सर संदर्भातील चाचण्या, कॅन्सरवरील उपचार, कॅन्सर होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, करावयाची कृती, लहान मुलांसाठी कोणती कोल्ड्रिंक्स घातक आहेत, त्यांना पॅकेटबंद पदार्थांपासून कसे दुर ठेवावे, फ्रिजमध्ये कोणते साहित्य ठेवावे, जास्त उन्हात का काम करू नये, महिलांनी उपवास कसा करावा या संदर्भात सखोल मार्गदर्शन या कार्यशाळेचे मार्गदर्शक कॅन्सर मिशन मल्टिपर्पज सोसायटी, नागपुरचे डॉ. प्रफुल्ल आमले यांनी केले. त्यांनी शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी पंचकर्म चिकित्सा याविषयी सविस्तर माहिती देत स्वेदन, स्नेहन, बस्ती यांचे महत्त्व विशद केले. यावेळी मोठय़ा संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी महिला दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धामधील विजेत्या महिलांचा बक्षीसे देऊन सन्मान करण्यात आला. प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला सुनिता सुरेश बागल, लता सुनील बागल, शालिनी रमेश गोरे, अनुजा बापूसाहेब घोडके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर बागल, शशिकांत गोरे,मुख्याध्यापक निलेश देशमुख, उपशिक्षिका वैशाली रोकडे, अंगणवाडी सेविका सुनीता बागल,उमा बागल,निता भोसले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी आयोजित विविध स्पर्धेत पुजा आकाश गोरे,अर्चना शशिकांत गोरे
रेश्मा प्रशांत बागल, माधुरी श्रीकांत गोरे, स्वप्नाली सुरज बागल यांनी क्रमांक मिळविले.

मुलांची अशी घ्या काळजी

लहान मुलांना पॅकेटबंद पदार्थ देणं टाळा, कारण त्यात जास्त साखर, मीठ, चरबी आणि रासायनिक टिकवणारे घटक असतात, ज्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयाचे विकार,कमी रोगप्रतिकारक शक्ती, पचनाच्या समस्या आणि मुलांमध्ये अतिचंचलता यांसारखे गंभीर आरोग्य धोके निर्माण होऊ शकतात. त्याऐवजी ताजे, घरगुती अन्न आणि फळे देणे उत्तम आहे. मुलांच्या टिफीन बाबत आईने जागृत राहणे आवश्यक आहे.