सोलापूर : तुम्ही घराचे बांधकाम करीत आहात. शेतात पाईपलाईन चा विचार करीत असाल तर तुर्त हे प्लॅन थांबवा. आखाती युद्धाचा भडका उडाला असला तरी इकडे भारतात महागाई भडकण्याची चिन्हे दिसत आहेत. युद्धाचे कारण सांगून निर्यात घटल्याने एकीकडे शेतीमालाचे भाव पाडले आहेत तर दुसरीकडे आयात घटल्याचे कारण दाखवून धातूच्या किमती चौपट वाढविण्यात आल्याचे दिसून येत आहे.
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाची टंचाई जाणवेल असे सांगितले जात होते. अशात सरकारने स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत वाढ केली. स्वयंपाकाच्या गॅस साठी रांगा लागल्यावर हॉटेलचा गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे बाजारात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. प्रशासन सर्व अलबेल असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात बाजारात महागाईने कहर करण्यास सुरुवात केली आहे. तांबे धातूची टंचाई जाणवत असल्यामुळे कृषी व घरगुती इलेक्ट्रिक उपकरणाच्या किमतीत तीन पट वाढ करण्यात आली आहे. कृषी संबंधी प्लास्टिक पाईप व इतर साधनांच्या किमतीत तीनशे रुपये वाढ करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक फिटिंगसाठी लागणारी तांब्याची वायर पूर्वी दीड हजार रुपयाला होती ती आता साडेचार हजारावर गेली आहेत. इलेक्ट्रिक साधनात तिप्पट वाढ झाली आहे. लोखंडाच्या किमतीतही वाढ झाली आहे. एकीकडे कृषी मालाचे भाव पडले असून दुसरीकडे महागाई वाढू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
या मागायच्या शासनाच्या घरकुल योजना वर मोठा परिणाम होणार आहे. बांधकाम साहित्यात झालेली वाढ सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर जाताना दिसत आहे. त्यामुळे लोकांना बांधकामे पुढे ढकलावी लागणार आहेत. आखाती युद्ध थांबेपर्यंत हे परिणाम जाणवणार असल्याचे सांगितले जात आहे.

More Stories
झेडपीच्या अर्थ विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा
‘स्टॉप कॅन्सर’ कार्यशाळेत महिलांना मिळाले कॅन्सर प्रतिबंधासाठी ज्ञान
ट्रेनिंग सेंटरमध्ये बेकायदा बदली; त्या बदल्यात घर बांधून घेतले