सोलापूर : सोलापुरात सुरू झालेली विमानसेवा आणि प्रस्तावित आयटी पार्क यामुळे शहराच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून आयटीसह विविध उद्योगांच्या वाढीसाठी नवे दालन खुले होईल, असा विश्वास बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश मुद्दा यांनी व्यक्त केला.
बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी ते बोलत होते संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्याहस्ते मुद्दा यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उमा मुद्दा, बिल्डर्स असोसिएशनचे माजी राज्याध्यक्ष दत्ता मुळे, संघाचे खजिनदार किरण बनसोडे उपस्थित होते
मुद्दा म्हणाले की, सोलापूरबद्दल जे ऐकले होते त्यापेक्षा शहराचे वातावरण अधिक सकारात्मक आणि विकासाभिमुख असल्याचे प्रत्यक्ष पाहून समाधान वाटले. विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूरचा देश-विदेशाशी संपर्क वाढेल, परिणामी गुंतवणूक आणि उद्योगांची वाढ होईल. संपर्काचे जाळे मजबूत झाल्यास आयटी उद्योगांसह इतर क्षेत्रांमध्येही मोठा विस्तार अपेक्षित आहे. इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले असून नव्या पिढीला नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे शहरात आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडण्यास मदत होईल. सोलापूर भविष्यात झपाट्याने प्रगती करणारे शहर म्हणून ओळख निर्माण करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
सोलापूर दौऱ्यादरम्यान मुद्दा यांनी महापालिका आयुक्त तसेच विविध बिल्डर्स यांच्या प्रकल्पांना भेट दिली. शहरातील विकासकामे आणि प्रकल्प पाहून समाधान झाल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांच्या भूमिकेबाबत बोलताना समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यात माध्यमांचे योगदान महत्त्वाचे आहे. पत्रकारांच्या माध्यमातून समाजात सुधारणा घडतात आणि जनजागृती होते. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगमेश जेऊरे यांनी केले तर उपाध्यक्ष आफताब शेख यांनी आभार मानले. याप्रसंगी शहरातील विविध वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांचे पत्रकार, कॅमेरामन उपस्थित होते.

More Stories
झेडपी अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ दलित पॅंथर महिला आघाडीचा आज मोर्चा
विस्तारअधिकारी मनोज म्हेत्रे यांना न्यायासाठी “कास्ट्राइब’चाही पुढाकार
गतवर्षीचे व्हिडिओ, पीपीटी पाहून जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन यांची आषाढी वारीची तयारी