सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे स्वीय सहायक सुधाकर माने- देशमुख यांनी बदली झालेल्या ठिकाणी म्हणजे अक्कलकोट पंचायत समितीतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागात सोमवारी हजेरी लावली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाअन्वये कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. शुक्रवारी ग्रामपंचायत व आरोग्य विभागातील करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये वीस वर्षाहून अधिक काळ एकाच ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत विभागातील 58 ग्रामसेवक वीस वर्षाहून अधिक काळ एकाच गावात कामकाज करीत असल्याचे दिसून आले होते. या सर्व ग्रामसेवकांची नव्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे स्वीय सहाय्यक सुधाकर माने देशमुख यांची अक्कलकोट येथे बदली झाली आहे. पाच वर्षाहून अधिक काळ मुख्यालयात कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येणार आहे. अशा कर्मचाऱ्यांची यादी तयार असून सोमवारी प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील इतर कामात व्यस्त असल्यामुळे या बदल्या करता आल्या नाहीत. लवकरच या बदल्या करण्यात येतील असे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितले. स्वीय सहाय्यक सुधाकर माने- देशमुख यांची बदली झाल्यामुळे त्यांनी पदभार सोडला आहे. बदलीच्या ठिकाणी सोमवारी ते अक्कलकोट पंचायत समितीकडे रुजू झाले आहेत असेही त्यांनी सांगितले.
16 जून रोजी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचा या दिवशी प्रवेशोत्सव होणार असल्याने त्याची तयारी करण्यात येत आहे. या दिवशी सर्वच जिल्हा परिषद शाळेत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. मुख्यालयातील सर्व अधिकाऱ्यांना या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेवर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याची चर्चा असली तरी राज्याच्या आरोग्य विभागाकडून याबाबत कोणत्याही नव्या मार्गदर्शक सूचना नाहीत. तरीही आरोग्य विभागाची बैठक घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. हवामान बदल व पावसाळ्यातील साथीचे आजार याबाबतही सतर्क राहण्याबाबत सांगण्यात आले आहे. पावसामुळे नद्या, नाले, ओढ्याना पाणी आले असून टँकरची चिंता मिटली आहे.
माध्यमिकच्या कारभारात सुधारणा
माध्यमिक शिक्षण विभागाच्या कारभारात सुधारणा होत आहे. आता नव्या बदल्यामुळे या विभागासाठी कर्मचारी देण्यात येणार आहेत, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी सांगितले.

More Stories
राज्यातील सर्व महिलांना लखपती दीदी बनविणार: जयकुमार गोरे
तुम्हाला बैलगाडी, घोंगडी हवी आहेत का? मग या ठिकाणी भेट द्या
सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित योजनेचा लाभ