सोलापूर : ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतीस, कामगिरीनुसार प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता, उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर प्रोत्साहन देण्याकरिता “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे पुरस्कार अभियान राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ उद्या रविवारी सोलापूर येथे होत आहे, अशी माहिती प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी दिली.
हुतात्मा स्मृती मंदिरात सकाळी १० वाजता जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवक यांची ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेते उदघाटन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्याहस्ते होणार आहे. याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व आमदार, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
ग्रामविकास विभाग दि. ०६ ऑगस्ट, २०२५ नुसार या अभियानास मान्यता देण्यात आली आहे.याबाबत माहिती देताना ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ म्हणाले, या अभियानाचे ७ मुख्य घटक आहेत. सुशासनयुक्त पंचायत (लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन) Governance) तयार करणे, सक्षम पंचायत (स्वनिधी, CSR व लोकवर्गणीतून पंचायत राज संस्थांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे), जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे, उपजिविका विकास, सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे अभियान कालावधीत वरील घटकांवर झालेल्या कामगिरीच्या आधारे गुणांकन करून पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे मार्गदर्शना खाली जिल्ह्यात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या अभियानाच्या पुर्वतयारीच्या अनुषंगाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेला जिल्ह्यातील सरपंचांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी केले आहे. राज्यात सर्वात प्रथम सोलापूर जिल्ह्याने या अभियानात आघाडी घेत तात्काळ नियोजन केले आहे. सर्वच ग्रामपंचायतीने या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.

More Stories
लाचखोर वेतन अधीक्षक बालवाड, ग्रंथपाल बारबोले या दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी
आषाढीवारी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांच्या सुरक्षेला देणार प्राधान्य
अन् कर्णबधिर विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर फुलले हास्य