March 11, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूर झेडपी भरती घोटाळा; ग्रामपंचायत कोट्यातून केली शिपायांची भरती

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेत जून 2019 मध्ये झालेल्या कर्मचारी भरती मध्ये ग्रामपंचायत कोट्यातून चक्क शिपायांची पदही भरण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. वास्तविक ही पदे ग्रामपंचायत राखीव कोट्यातून भरता येत नाहीत. असे असताना जाणीवपूर्वक “मास्टरमाइंड’ने वरिष्ठांची दिशाभूल करून ही पदे भरल्याचे दिसून आले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेत कोरोना महामारी काळात करण्यात आलेल्या कर्मचारी भरतीतील घोटाळा सध्या राज्यात गाजत आहे. या भरतीत ग्रामपंचायत कोट्यातून भरण्यात येणाऱ्या पदांमध्ये 55 पदे अधिक भरण्यात आल्याचे दिसून आले आहे. तसा अहवाल तत्कालीन सीईओ मनीषा आव्हाळे व विद्यमान सीईओ कुलदीप जंगम यांनी शासनाला दिला आहे. असे असताना हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. मात्र कर्मचारी युनियनने याला आव्हान दिले आहे. त्यामुळे यातील गंभीर बाबी आता चव्हाट्यावर आल्या आहेत. लक्ष्मी दर्शनासाठी जाणीवपूर्वक हा घोटाळा करणाऱ्या मास्टरमाइंडला बेड्या ठोका अशी आता कर्मचाऱ्यातून मागणी होत आहे.

जून 2019 मध्ये जिल्हा परिषद कर्मचारी भरती करताना ग्रामपंचायत कोट्यातील दहा टक्के पदांचा विपर्यास झाला. ग्रामपंचायत कोट्यातील पदभरती करताना कोणते पदे भरावयाची याबाबत शासनाचा स्पष्ट अध्यादेश आहे. असे असताना चक्क शिपाई पदे भरली गेल्याचे आता सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही अनियमितता नसून जाणीवपूर्वक केलेला घोटाळा आहे हे आता उघड झाले आहे. यात कर्मचारी युनियनचे दिशाभूल होत असल्याचे दिसून येत आहे. कोणाचा अहवाल खरा मानावा असा त्यांनाही प्रश्न पडला आहे. त्यामुळे त्यांनी हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात नेले होते. न्यायालयानेही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यावर निर्णय घ्यावा असे सुचवले आहे. त्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी स्पष्ट निर्णय दिला आहे. या भरतीत अनियमितता झाले असून संबंधितांचे आम्ही चौकशी करीत आहोत असे त्यांनी नमूद केले आहे. सीईओ यांनी प्रस्तावित केलेली खातेनिहाय चौकशी होईल तेव्हा होईल. यात उपमुख्य कार्यकारी दर्जाचा अधिकारी अडकल्याने विभागीय आयुक्तांमार्फत याची चौकशी होऊन संबंधितावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे. या प्रकरणाचा “मास्टरमाईंड’ कोण? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे त्याचा कारनामा अधिक उजेडात येण्यासाठी याबाबत पोलीस कारवाई अपेक्षित आहे. विभागीय आयुक्त पुलकुंडवार ही बाब किती गांभीर्याने घेतात यावर या प्रकरणाचा पर्दाफाश होणार आहे.