May 3, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूरचा बारावीचा निकाल 87%; कॉपीमुक्त अभियानाचा दिसला प्रभाव

सोलापूर : पुणे बोर्डतर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून सोलापूर जिल्ह्याचा निकाल 87 टक्के लागला आहे अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली. बारावीच्या निकालावर कॉपीमुक्त अभियानाचा चांगला प्रभाव दिसून आल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळाम फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या निकाल प्रक्रियेचे पूर्ण झाले असून या परीक्षेचा निकाल जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत असल्याचे पुणे बोर्डाचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांनी म्हटले आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या निकाल माहिती यासोबत सादर करण्यात आलेली आहे. या परीक्षेस नोंदणी झालेल्या नियमित विद्यार्थ्यांची संख्या २,४४,९९१ असून त्यापैकी २,४९,८२६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या २,२०,६८० असून उत्तीर्णतेच्या निकालाची टक्केवारी ९१.२५ आहे. तसेच या परीक्षेस नोंदणी झालेल्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या ७,६४४ असून त्यातील ७,४७१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ५,७७९ असून उत्तीर्णत निकालाची टक्केवारी ७७.३५ आहे. विशेष म्हणजे दरवेळेप्रमाणे याही वेळेस मुलींनी निकालात बाजी मारली आहे.

जिल्हानिहाय निकाल पुढीलप्रमाणे.

जिल्हा नोंदणी केलेले विद्यार्थी प्रविष्ठ, उत्तीर्ण टक्केवारी

पुणे:१,३०,८९९, १,२९,९४१,१,२१,२६३,    ९३.३२

अहमदनगर:५९,५६५, ५८,८९५, ५३,१९६,  ९०.३२

सोलापूर: ५३,७२७, ५२,९९०, ४६,२२१,   ८७.२२

एकूण: २,४४,१९१, २,४१,८२६, २,२०,६८०,  ९१.२५

निकालाची वैशिष्ट्ये

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) फेब्रुवारी-मार्च २०२६ ची परीक्षा दिनांक १० फेब्रुवारी, २०२६ ते १८ मार्च, २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्रीम. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच दादाजी भुसे, मंत्री, शालेय शिक्षण, डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री, शालेय शिक्षण,  राजेश अग्रवाल, मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, रनजीतसिंह देओल, प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, सचिन्द्र प्रतापसिंह, आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेचे प्रत्यक्ष संचालन करण्यात आले होते. तसेच राज्यस्तरीय दक्षता समितीचे सदस्य विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्रे, अतिरिक्त आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालक (योजना) त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय दक्षता समिती सदस्य जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी सदस्य, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना) यांचे सहकार्य मिळाले.त्याचप्रमाणे मुख्य नियामक, नियामक, परीक्षक, सर्व संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व संघटना, मंडळाच्या सर्व समित्यांचे सन्माननीय सदस्य, मंडळातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालक या सर्वांच्या बहुमोल सहकार्यामुळेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेचा निकाल आज शनिवार, दिनांक ०२ मे, २०२६ रोजी जाहीर करताना मनस्वी आनंद होत आहे. परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे मनःपूर्वक अभिनंदन. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा! उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता पुरवणी परीक्षेस प्रविष्ट होऊन यश संपादन करावे. पुरवणी परीक्षेसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.

परीक्षेची प्रमुख वैशिष्ट्ये

विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचे वेळापत्रक तयार करताना प्रमुख विषयांच्या लेखी परीक्षेच्या दरम्यान किमान एक दिवसाचा खंड ठेवण्यात आला होता, सदरचे वेळापत्रक दिनांक ३१/१०/२०२५ रोजी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते.बारावी परीक्षेसाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबतची जबाबदारी पार पाडाण्यात आली.

दि. १९/०१/२०२६ रोजी मा. आयुक्त (शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय दक्षता समितीची ऑनलाईन सभा घेण्यात आली. सदर सभेमध्ये फेब्रुवारी-मार्च २०२६ इ. १० वी व इ.१२ वी च्या परीक्षा शांततेत व तणावमुक्त वातावरणात पार पाडणे तसेच राज्यभर कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. शासन निर्णय क्र. संकीर्ण ३८२५/प्र.क. १३३/ एसडी-२ दि.२४/११/२०२५ नुसार मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून दि.०९/०१/२०२६ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा दक्षता समिती यांची जबाबदारी व कार्य निश्चित करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवणे तसेच संबंधित केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करणे. Maharashtra Prevention of Malpractices Act 1982 या कायदयाची अंमलबजावणी व कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणारे या सर्वांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करणे. दिनांक २७/०१/२०२६ रोजी मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मा. आयुक्त (शिक्षण), पोलीस आयुक्त (सर्व), जिल्हाधिकारी (सर्व), अध्यक्ष, राज्य मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी (सर्व), पोलीस अधीक्षक, उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व सर्व विभागीय मंडळ अध्यक्ष यांची दूरचित्रप्रणालीद्वारे (ऑनलाईन) सभा घेण्यात आली. सदर सभेमध्ये फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या इ.१० वी व इ.१२ वी च्या परीक्षा शांततेत व तणावमुक्त वातावरणात पार पाडणे तसेच राज्यभर कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या.

कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत राज्य मंडळाने केलेली कार्यवाही. राज्य मंडळामार्फत सोशल मीडियाचा वापर विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व पालकांना योग्य ते संदेश पाठविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर करण्यात आला आहे. ३३०००+ मुख्याध्यापक / प्राचार्य यांना परीक्षा व कॉपीमुक्त अभियाना संदर्भात Email, SMS, WhatsApp Bulk Message द्वारे कळविण्यात आले आहे. परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहायक परिरक्षक (रनर) यांनी परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून मुख्य केंद्र व उपकेंद्रावर काम केलेले आहे. तसेच फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेमध्ये सहायक परिरक्षक (रनर) यांनी परिरक्षण केंद्रावरून गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ते परीक्षा केंद्रावर पोहोचेपर्यंत व वितरित करेपर्यंतचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकांची गोपनीयता अबाधित राहण्यासाठी मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोच करण्याकरिता व उत्तरपत्रिका आणण्याकरिता नेमण्यात आलेल्या सहायक परिरक्षक (रनर) यांनी जीपीएस प्रणाली सुरू ठेवणे आवश्यक करण्यात आले होते.

गतवर्षीप्रमाणेच फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आली होती.विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा (NEET, JEE) तसेच परीक्षांचे निकाल लवकर जाहीर होऊन पुरवणी परीक्षा लवकर घेण्याच्या दृष्टीने यावर्षी इ.१२ वी ची परीक्षा नेहमीपेक्षा दहा दिवस अगोदर आयोजित करण्यात आली होती. परीक्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे विभागीय मंडळाच्या स्तरावर जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली होती. तसेच राज्यमंडळ व ९ विभागीय मंडळामध्ये नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली होती. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ करिता एकूण १५३ विषयांसाठी पराक घेण्यात आली. विज्ञान शाखेसाठी इंग्रजी, मराठी, हिंदी आणि उर्दू या चार माध्यमांतून व इतर शाखांसाठी इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती व कन्नड अशा सहा माध्यमांसाठी विद्यार्थ्यांनी मंडळाकडे नोंदणी केलेली होती. फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेमध्ये प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत (Practical & Internal) श्रेणी इत्यादी परीक्षांचे गुण Portal वर ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्यात आले आहेत. इ.१२ वी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा प्रस्ताव क्रीडा विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आले व त्याची छाननी पडताळणी विभागीय मंडळस्तरावर ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली.

गैरमार्ग प्रतिबंधक उपाययोजना

फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या इ. १२ वी व इ. १० वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शासनस्तरावरून व मंडळस्तरावरून विविध उपाययोजना केलेल्या होत्या.  राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्याकरिता मंत्री, शालेय शिक्षण यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक २५/११/२०२५ रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार : ज्या परीक्षा केंद्रावर CCTV उपलब्ध आहेत तेथे परीक्षा कॅमेराबद्ध घेण्यात आल्या.ज्या परीक्षा केंद्रांवर परीक्षेशी निगडित स्टाफकडून गैरप्रकार झाला असेल, अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या इ.१० वी व इ.१२ वी परीक्षेच्यावेळी राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये दि. १९/०१/२०२६ ते दि. २६/०१/२०२६ या कालावधीत कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला.

शासन निर्णय क्र. परीक्षा १६२५/प्र.क्र.२२१/एसडी-२ दि. ०९/०१/२०२६ नुसार मा. आयुक्त (शिक्षण) यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय दक्षता समितीचे गठण करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यस्तरीय दक्षता समितीने इ.१० वी व इ.१२ वी च्या परीक्षा शांततेत व तणावमुक्त वातावरणात पार पडतील, असे वातावरण निर्माण करावे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्याच्या दृष्टीने इ.१० वी व बारावीच्या परीक्षा पार पाडण्यात आल्या.