February 21, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

पंढरपुरात नाशिकच्या महाराजांसह तिघांना पुरातून वाचविले

सोलापूर : पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरसाळे येथील भीमा नदीचे पात्रातील मंदिरात अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या नाशिकच्या महाराजांसह तिघांना पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने वाचविले.

गुरसाळे येथे भीमा नदीच्याकडेला असलेल्या मंदिरामध्ये तीन भाविक मंदिरामध्ये चारी बाजूने पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे मंदिराच्या मध्यभागी पाण्यामध्ये अडकलेले होते. याची माहिती पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याला मिळाल्यानंतर तहसीलदार लंगोटे, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तयब मुजावर यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेतलेले पोलीस हवालदार सागर गवळी, गजानन माळी, विजयकुमार आवटी व पुण्यामध्ये पटाईत असलेले पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण खेडकर तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे इतर लोक यांच्याबरोबर स्वतः घटनास्थळी धाव घेतली. गुरसाळे नदीपात्राच्या ब्रिजजवळ हे पथक पोचल्यानंतर त्यांना पुराच्या पाण्यात वेढलेल्या  मंदिरामध्ये अडकलेले तीन भाविक मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून आले. त्याबरोबर तहसीलदार लंगोटे व पोलीस निरीक्षक मुजावर यांनी तातडीने मदत व बचाव कार्य करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी रवाना केले. पोलीस हवालदार गवळी यांनी इलेक्ट्रिक पाण्याच्या बोटीमध्ये बसून त्या ठिकाणी जाऊन  मंदिरामध्ये अडकलेल्या लोकांना इलेक्ट्रिक बोटीमध्ये बसून त्यांना सुखरूपपणे नदीच्या पाण्यातून बाहेर काढले. मंदिरातून सुखरूपपणे बाहेर काढलेल्या भाविकांची नावे अशी आहेत. श्रीकृष्णानंद महाराज जाधव (वय 65 वर्षे, राहणार नाशिक),  सुभाष संभाजी धवन (वय 45, राहणार गुरसाळे), विठ्ठल रामभाऊ लोकरे (वय 52 वर्षे, राहणार गुरसाळे). नाशिकचे श्रीकृष्णानंद महाराज सोमवारी पहाटे गुरसाळे येथील सुभाष व विठ्ठल या दोघा भाविकांना घेऊन महादेव मंदिरात पूजाआर्चेसाठी गेले होते. भीमा नदीच्या वरच्या भागातील क्षेत्रा त जास्त पाऊस झाल्याने सोमवारी दुपारी अचानक पाणी वाढले. पुराच्या पाण्याने या मंदिराला वेढा घातला. पाणी वाढत चाललेले पाहून या तिघांना संकटाची चाहूल लागली व त्यांनी मदतीची हाक दिली. या तिघांनाही नदीच्या पाण्यातून सुखरूपाने बचाव कार्य पंढरपूर तालुका पोलीस टीम पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन माळी, पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी व आपत्ती व्यवस्थापनाचे सहकारी  विठ्ठल आदटराव, महेश प्रचंडे, साहिल माने, गणेश कोळी यांच्या पथकाकडून पार पडले आहे. याबद्दल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या टीमचे अभिनंदन केले आहे.