March 16, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

“कास्ट्राईब’ च्या मागणीकडे सोलापूर झेडपी प्रशासनाची डोळेझाक

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद कास्ट्राइब कर्मचारी संघटनेच्या निवेदनाकडे झेडपी प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न होत आहे. याबाबत पदाधिकाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी या प्रश्न लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

जिल्हा परिषदेत कास्ट्राइब ही शासनमान्य कर्मचारी संघटना आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या सचिवाच्या आदेशानुसार दर तीन महिन्याला या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर जिल्हा परिषदेच्या प्रमुखांनी बैठक घेऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडावाव्यात असा आत्तापर्यंतचा शिरस्ता आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पदभार घेतल्यापासून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर एकही आढावा मीटिंग झालेली नाही. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांनी याबाबत प्रशासनाला वेळोवेळी पत्र देऊन बैठक घेण्याबाबत विनंती केली आहे. तरीही प्रशासन विभागाने हे पत्र सीईओंच्या निदर्शनाला न आणता आपला कार्यक्रम पुढे रेटण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात कास्ट्राईब संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबाबत सीईओंची आढावा बैठक झालीच नाही. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत वर्षातून किमान एकदा तरी बैठक घेण्यात यावी अशी मागणी होत आहे. आतापर्यंतच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा शीरस्ता पाळला आहे.असे असताना गेले वर्षभर जाणून-बुजून कास्ट्राईब संघटनेच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा प्रकार समोर येत आहे. कास्ट्राइबच्या विनंतीला प्रशासनाने किरकोळीत घेतले तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

 

कर्मचाऱ्यांच्या समस्यांसाठी बैठक घेण्याबाबत संघटनेने प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. परंतु अद्याप संघटनेला वेळ देण्यात आलेला नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी कर्मचाऱ्यांसाठी चांगले काम केले आहे. बदल्या, पदोन्नत्यामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांना न्याय दिला आहे. पण तरीही कर्मचाऱ्यांच्या काही रास्त मागण्याबाबत बैठक होणे गरजेचे आहे.

अरुण क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष, कास्ट्राईब