सोलापुरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा भुलभुलैय्याच
जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकसान भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी

सोलापूर : गतवर्षी आवर्षणामुळे खरीप पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई मंजूर केली पण लोकसभा निवडणुकीपासून केवायसीचे निमित्त करून अद्यापपर्यंत भरपाई खात्यावर न टाकल्याबद्दल शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. गेल्या महिन्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे रक्कम जमा झाल्याचे सांगण्यात आले पण बऱ्याच शेतकऱ्यांना ही रक्कम मिळालीच नसल्याचे दिसून आले आहे.
गतवर्षी खरीप पेरणी झाल्यानंतर पुरेसा पाऊस पडलाच नाही. जिल्ह्यातील चार तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला तर इतर तालुक्यातील पीकनिहाय सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करण्यात आली. शेतकऱ्यांना मंजूर झालेली भरपाईची आकडेवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तलाठ्यांना पाठवण्यात आली. भरपाईच्या पैशाच्या आकडेवारीकडे पाहून शेतकऱ्यांना निदान यंदाच्या खरीप पेरणीला तरी सरकार आपल्या मदतीला धावून आले अशी आशा वाटली. दरम्यान लोकसभा निवडणूक आली. त्यामुळे नुकसान भरपाई लटकली. त्यानंतर शेतकऱ्यांना केवायसी करून घेण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सूचना देण्यात आल्या. अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन सेंटरवर रांगा लावून केवायसी करून घेतली. केवायसीला तीन महिने उलटले तरी नुकसान भरपाईची रक्कम खात्यावर पडण्याचे नावच नाही. याबाबत काही लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर दक्षिण सोलापुरातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाल्याचे पाठपुरावा करणाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदनही केले. पण त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना ही रक्कम मिळालेली नाही. संबंधित शेतकऱ्यांनी तलाठ्यांशी संपर्क साधल्यावर ही रक्कम मुंबईवरून खात्यावर टाकण्यात येत असल्याचे उत्तर देण्यात आले. त्यामुळे हा पाठपुरावा व रक्कम मिळाल्याचे प्रसिद्धीकरण हे राजकारण असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. आता विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे पुन्हा या शेतकऱ्यांची भरपाई लटकणार आहे.