सोलापूरजिल्हाधिकारी कार्यालय

रेशनकार्डवर सहा तर पॉस मशीनवर एकाच व्यक्तीची नोंद

उत्तर सोलापूर तहसील पुरवठा विभागाचा कारभार

सोलापूर : उत्तर तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग नागरिकांसाठी “शाप की वरदान’ अशी चर्चा नागरिकात सुरू आहे. त्याचं कारणही तसंच असून रेशनकार्डवर सहा व्यक्तीच्या नोंदी तर पॉस मशीनवर एकाच व्यक्तीची नोंद दिसत असल्याने रेशन दुकानदार वैतागले आहेत. याप्रकारांमुळे ग्राहक व रेशन दुकानदारांमध्ये भांडणे होत आहेत.

सोलापूर उत्तर तहसील कार्यालयअंतर्गत उत्तर सोलापुरातील ग्रामीणसाठी पुरवठा विभाग कार्यरत आहे. या कार्यालयात तालुक्यातील पुरवठा विभागातर्फे रास्तभाव धान्य दुकानावर नियंत्रण, तसेच नागरिकांना नवीन शिधापत्रिका देणे, नाव कमी- जास्त करणे,जीर्ण झालेल्या किंवा गहाळ झालेल्या कार्डाचे नूतनीकरण करणे, तसेच रेशन दुकानातून धान्य सुविधा मिळण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येत आहे.या कार्यालयातून नागरिकांची कामे प्रधान्याने होणे अपेक्षित असताना मात्र संबंधित अधिकार्याकडून चुकीच्या पद्धतीने कामे होताना पहावयास मिळत आहे. पुरवठा विभाग हा जरी ग्रामीण भागासाठी असला तरी पुरवठा कार्यालय हे शहरात असल्याने बहुतांश नागरिकांना तालुक्यातून नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत. अनेक नागरिकांना आपल्या कुटूंबातील लग्न होऊन गेलेल्या, विभक्त कुटुंब किंवा मयत व्यक्तीचे नाव कमी करण्यासाठी कार्यालयात जावे लागते. मात्र संबंधित कार्यालयात शिधापत्रिकेतून रीतसर नाव कमी न करता कार्डात नावाची नोंदी तसेच ठेवून फक्त ऑनलाईन नाव कमी करणे, तसेच कुटूंबातील प्रमुखाचे नाव दुरुस्त करणे, पूर्ण नाव न घेता फक्त अर्धवट नाव नोंद करणे अशा अतिशय चुकीच्या पद्धतीने काम होत आहे.त्यानंतर नागरिकांना काम पूर्ण झाले असे सांगून दलालामार्फत एक किंवा दोन हजार रुपये माथी मारले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. आर्थिक पिळवणूक झालेला कार्डधारक जेव्हा रास्त भाव धान्य दुकानात येतो तेव्हा पॉस मशीनवर चुकीची दुरुस्ती झाली नसल्याचे कळताच ग्राहक व दुकानदारात शाब्दिक चकमकी होत आहेत. याबाबत रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने निवेदन देऊनही जाणीवपूर्वक कानाडोळा होत असल्याचे सांगण्यात आले. ज्यावेळी शिधापत्रिकाधारक आपल्या कार्डातील नाव कमी- जास्त किंवा दुबार करण्यासाठी अर्ज दाखल करतात, त्याचवेळी त्या कार्डातील ऑनलाईन प्रक्रियामधून दुरुस्ती होणं अपेक्षित असताना, फक्त कुटुंबप्रमुख दुरुस्त केले जात आहेत.नागरिकांना आपल्या शिधा पत्रिकेतील दुरुस्तीकरिता रोजंदारी बुडवून सोलापूर शहरात यावे लागते. परंतु आल्यावरही अश्या चुकीच्या पद्धतीचे कामे शिधापत्रिकाधारकाच्या माथी मारण्याचे काम संबंधित कार्यालयाकडून होत आहे.यापूर्वीही या कार्यालयात बऱ्याच चुकीच्या पद्धतीने काम होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या प्रकरणात लक्ष न घातल्याने अशाप्रकारे प्रकाराला पाठबळ मिळत असल्याची तक्रार नागरिकांमधून होत आहे.

रेशनधान्य वितरण प्रणालीत महाराष्ट्रसह सोलापूर जिल्ह्यात ऑनलाईन प्रणालीत सुधारणा होऊनसुद्धा उत्तर तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग मात्र जाणीवपूर्वक नागरिकांना वेठीस धरत असल्याने संबंधित पुरवठा कार्यालय शिधापत्रिकाधारकांना  “शाप की वरदान’ अशी चर्चा सुरू झाली आहे. उतर तहसील पुरवठा शाखेमधील अश्या चुकीच्या कामाला नेमका वरदहस्त कोणाचा? असाही सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button