सोलापूरसोलापूर ग्रामीण पोलीस
मंद्रूप येथे शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

सोलापूर:मंद्रुप येथील नाईकनगर तांड्यावरील दोन मुलांचा रविवारी दुपारी शेततळ्यात पोहण्यासाठी गेल्यानंतर बुडून मृत्यू झाला.
समर्थ मोहन चव्हाण (वय १३) व ओंकार रमेश चव्हाण (वय १२, दोघेही राहणार नाईकनगरतांडा मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर) अशी शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.मंद्रुप पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. मंद्रूप – वांगी रस्त्यावर नाईकनगरच्या पुढे मोहन थावरू चव्हाण यांची शेती आहे. त्यांच्या शेतातील शेततळ्यात पोहण्याकरीता दुपारी समर्थ चव्हाण व ओंकार चव्हाण गेले होते. सायंकाळी सहा वाजले तरी दोन्ही मुले घरी परत न आल्याने शालनबाई थावरू चव्हाण व शिवाजी चव्हाण हे मुलांच्या शोधासाठी गेले. शेततळ्यावर जाऊन पाहिले असता दोन्ही मुले पाण्यावर तरगंत असल्याचे दिसले. लागेच नाईकनगर तांड्यावरील काही लोकांना बोलावून पाण्यातून बाहेर काढले. खाजगी वाहनातुन उपचाराकरिता बेशुध्द अवस्थेत ग्रामीण रुग्णालय मंद्रुप येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासुन दोघांचाही उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच मंद्रुपचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी हे ग्रामीण रुग्णालय आले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर डॉक्टरांनी दोघांचे शवविच्छेदन केले. रात्री उशिरा दोन्ही मुलांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात नाईकनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची शिवाजी बाळासाहेब चव्हाण, रा नाईकनगर तांडा मंद्रुप यांनी पोलीसात खबर दिली आहे.



