झेडपीतील वाहन चालकांच्या समस्या सोडवा
कास्ट्राईब संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आग्रह

सोलापूर :कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, सोलापूर शाखेच्यावतीने संघटना पदाधिकारी, कार्यकारीणी सदस्य, सभासद व हितचिंतक यांच्यासाठी जनजागृती मार्गदर्शन सभा जिल्हा परिषदेच्या विसावा रेस्ट हाऊसमधील सभागृहात संपन्न झाली. सभेपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेऊन वाहनचालकांच्या समस्या सोडविण्याबाबत निवेदन देण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुणभाऊ क्षीरसागर होते तर प्रमुख मार्गदर्शन म्हणून संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष गणेश मडावी, उपाध्यक्ष गिरीश जाधव, सोलापूर जिल्हा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनिष सुरवसे हे उपस्थित होते.
सभा सुरू होण्याअगोदर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेऊन जिल्हा परिषदमधील वाहन चालक व सर्व संवर्ग कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणीबाबत निवेदन सादर करण्यात आले. याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी दिले.
सभेत मार्गदर्शन करताना गणेश मडावी यांनी सर्व शाखा अध्यक्षांनी सभासद संख्या वाढवावी, खातेनिहाय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठका घ्याव्यात, आपापल्या खाते प्रमुखांना बैठकीस वेळ मागून बैठकीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, संघटनेचे काम तन-मन-धनाने सामाजिक जाणीवेतून करावे व कर्मचाऱ्यांमध्ये जागृती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती सभा घेणार असल्याची यावेळी घोषणा केली. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गिरीश जाधव, जिल्हाध्यक्ष मनीष सुरवसे, यांनी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक संघटनेचे कोषाध्यक्ष कल्याण श्रावस्ती यांनी केले तर आभार उपाध्यक्ष उमाकांत राजगुरू यांनी मानले.याप्रसंगी पुणे विभागीय उपाध्यक्ष राजू कलगुटगी, कास्टाईब वाहन चालक संघटना सांगलीचे उपाध्यक्ष वैभव कोळी, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस अरविंद जेटीथोर, संघटक लक्ष्मण गायकवाड, कोषाध्यक्ष विजयकुमार लोंढे, जिल्हा परिषद शाखेचे संजय कांबळे, बी.के. चव्हाण, मकरंद बनसोडे, चंद्रकांत होळकर, नरसिंह गायकवाड, नागसेन कांबळे, श्रीकांत मेहकर, सावळा काळे, रामदास गुरव, संतोष जाधव, चेतन भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते तर दीपक चव्हाण, भीमाशंकर कोळी, विजय हराळे, शहानाज शेख, वांगीकर, लालसिंगी, विलास पाटील, कैलास लोकरे, फुगे आदींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.