
सोलापूर : सोलापुरात मंगळवारी दोन वेगवेगळ्या घटनेत दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. मंगळवेढा रस्त्यावर स्कूलबसखाली चिरडून शाळकरी मुलाचा मृत्यू तर सोलापुरात सायंकाळी सुटलेल्या वादळामुळे घराच्या लोखंडी जिन्याला विजेचा तारेचा स्पर्श होऊन एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला आहे.
मंगळवेढा मार्गावर शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या धावत्या स्कुलबसमधून पडून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ज्या स्कुलबसमधून विद्यार्थी पडला त्याच्याच मागच्या चाकाखाली येऊन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, विद्यार्थ्याच्या चेहऱ्याचा संपूर्ण चेंदामेंदा झाला होता. अनुराग तिपणा राठोड (वय 13 वर्षे,रा,बसवेश्वर नगर,शेगावतांडा,सोलापूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांना शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. स्कुलबसच्या चालकावर पोलिसांनी कारवाई केली आहे.
अनुराग रोज स्कुलबसमधून घरी जायचा. कवठे येथील एका आश्रम शाळेत अनुराग राठोड शालेय शिक्षण घेत होता. दररोज स्कुलबसमधून अनुराग घरी जात होता. कडक उन्हाळा सुरू झाल्याने अनेक शाळांचे वेळापत्रक सकाळच्या सत्रात झाले आहे. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर स्कुलबस मधून अनुराग घरी जात होता. स्कुलबसच्या दरवाज्याजवळ उभा असताना अचानकपणे तोल जाऊन अनुराग धावत्या स्कुलबसमधून बाहेर पडला. स्कुलबसचा वेग अधिक होता, त्यामुळे स्कुलबस चालकाला लक्षात आले नाही. इतर विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर थोड्या अंतरावर जाऊन स्कुलबस थांबवली. अनुराग हा त्याच स्कुलबसच्या मागील चाकात आला होता. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती.
विजेचा शॉक लागून…
दुसऱ्या घटनेत मंगळवारी सायंकाळी सोलापुरात सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा लोखंडे जिन्याला चिटकल्यामुळे कोनापुरे चाळीतील राजनंदिनी कांबळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. त्यांच्या घराच्या वरून गेलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श त्यांच्या घराच्या लोखंडी जिन्याला झाला. त्याचवेळी राजनंदिनी हिचा स्पर्श त्या जिन्याला झाल्याने तिला विजेचा जोरदार धक्का बसला आणि ती जागीच कोसळली हे समजल्यावर नातेवाईकांनी तातडीने तिला एका खाजगी रुग्णालयात हलवले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच ती मरण पावल्याचे सांगितले.