August 16, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूरकरांना दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणार: पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर : सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी ई-बसेसचा विषयही मार्गी लागला आहे. केंद्र शासनाच्या योजनेतून सोलापूर शहरासाठी 100 ई – सिटी बसेस मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी 4 बसेस शहरात दाखल झाल्या आहेत. आणखी 16 बसेस लवकरच पोहोचत असून पहिल्या टप्प्यात एकूण 20 ई-बसेस शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

केंद्र शासनाच्या पीएम ई बस योजनेतून महापालिकेसकडे आलेल्या चार ई बसेसचे लोकार्पण फीत कापून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, नगरसेविका रोहिणी तडवळकर यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री गोरे म्हणाले की, शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छतेच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या मालकीच्या 4 स्वीपींग मशीन उपलब्ध झाल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच सोलापूरच्या विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. विमानसेवेपासून ते बी-2 च्या महत्वाच्या प्रश्नापर्यंत अनेक रखडलेले विषय आता मार्गी लागले आहेत. शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असणारा उड्डाणपुलाचा प्रश्नही विशेष होता. त्यासाठी 93 टक्के जमीन आपल्या ताब्यात आली असून त्याचे काम लवकरच प्रत्यक्षात सुरू होईल, असे त्यांनी म्हटले.सोलापूरच्या जनतेसाठी मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जो जो शब्द आम्ही दिला होता त्या पूर्तीच्या दिशेने आम्ही चाललो आहोत” असे सांगून पालकमंत्री गोरे यांनी नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.